Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी

गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
, मंगळवार, 30 जून 2020 (16:41 IST)
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना प्रतिव्यक्ती 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो चणे मोफत दिले जाणार आहेत.
 
पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेच्या विस्तारासाठी 90 हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात येणार आहे. यापूर्वीचे तीन महिने आणखी जोडले तर एकूण लाख कोटी रुपये खर्च यासाठी होणार आहे.
 
80 कोटी भारतीयांना याचा लाभ मिळेल असं पंतप्रधांनांनी स्पष्ट केलंय.
 
मान्सून काळात कृषी क्षेत्रात अधिक काम असतं. तसंच सणासुदीच्या काळात पैसे लागतात. म्हणून दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे.
 
शेतकरी आणि करदात्यांचे आभार
यावेळी मोदींनी शेतकरी आणि करदात्यांचे आभारही मानले. ते म्हणाले
 
"संपूर्ण देशासाठी एक राष्ट्र, एक रेशनकार्ड व्यवस्था लागू होत आहे. याचा लाभ गरीब नागरिकांना मिळेल. सरकार गरिबांना मोफत अन्न देऊ शकतेय याचं श्रेय शेतकऱ्यांना जातं. ते अन्नदेवता आहेत. आपल्या देशातील इमानदार करदाते. त्यांचं परिश्रम, समपर्ण यामुळे देश गरिबांना मदत करू शकत आहे. तुम्ही अन्नभांडार भरलं आहे. त्यामुळेच गरीब, श्रमिकांची चूल पेटते आहे. तुम्ही कर भरून तुमचं दायित्व निभावलं आहे. कठीण परिस्थितीत गरीब जगतो आहे. करदात्यांचं अभिनंदन आणि त्यांना वंदन करतो."
 
तसंच मास्क, गमछा, फेसकव्हर यांचा उपयोग करा, याची आठवण मोदींनी करून दिली. बेपर्वाई करू नका, हलगर्जीपणा करू नका, असंही हे म्हणालेत.
 
कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारनं राबवलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहितीसुद्धा मोदींनी यावेळी दिली.
 
याआधी 5 वेळा देशाला उद्देशून भाषण
कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा देशाला उद्देशून भाषण केलंय.
 
गेल्या महिन्यात म्हणजे 12 मे रोजी 20 लाख कोटींचं आत्मनिर्भर पॅकेज जाहीर करताना मोदींना देशवासियांना उद्देशून शेवटचं भाषण केलं होतं.
 
भारत सरकारनं कालच म्हणजे 30 जून रोजी 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली. हॅलो, टिक टॉक, यू ब्राऊजर अशा प्रसिद्ध अॅप्सचाही त्यात समावेश आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं चिनी अॅप्सवर बंदीचा निर्णय घेतला.
 
दुसरीकडे, भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येनंही लाखोंचे टप्पे पार केलेत. शिवाय, दिल्ली, महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दरही गंभीर आहे.
 
कोरोनाची भारतातील सद्यस्थिती काय आहे?
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 10 हजार 120 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, तर 3 लाख 21 हजार 723 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 
भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुद्धा चिंताजनक आहे. आतापर्यंत 16 हजार 475 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं 29 जूनपर्यंतची ही आकडेवारी प्रसिद्ध केलीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वदेशी असलेली कोरोना लस तयार, मानवी चाचणीला परवानगी