Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट- आधी सत्तास्थापनेची चर्चा करून शरद पवारांनी ऐनवेळी निर्णय बदलला

देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट- आधी सत्तास्थापनेची चर्चा करून शरद पवारांनी ऐनवेळी निर्णय बदलला
, मंगळवार, 23 जून 2020 (17:17 IST)
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सोबत येण्यासाठी थेट शदर पवारांनीच ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
 
पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता थेट राष्ट्रवादीकडून ऑफर होती अजित पवारांकडून नाही, असे शब्द वापरले आहेत.
 
त्याचबरोबर अजित पवार यांच्याबरोबर स्थापन झालेल्या त्या 80 तासांच्या सरकारचे शिल्पकार अमित शाह होते, असं सांगत अमित शाहांनी त्यावेळी पाठिंबा दिला नसल्याच्या अफवांवर उत्तर दिलं आहे.
 
80 तासांच्या सरकार बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे, "आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, म्हणजे अजित पवार नाही... थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. त्यावेळी योग्य त्या चर्चा झाल्या होत्या. व्हायला पाहिजे त्या सर्व चर्चा झाल्या, पण त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका बदलली."
 
"त्यानंतर दोन-तीन दिवस आम्ही शांत होतो, त्यानंतर मात्र आम्हाला अजित पवारांकडून फिलर आला, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी शरद पवारांची भूमिका मान्य नाही असं सांगितलं. तीन पक्षाचं सरकार चालू शकत नाही. भाजप-राष्ट्रवादी स्थिर सरकार देऊ शकतील म्हणून मी तयार आहे, असं अजित पवारांनी म्हटलं.
 
'त्यावेळी जे योग्य वाटलं तेच केलं'
अजित पवारांसोबत झालेल्या शपथविधीनंतरच्या घडामोडींमुळे आता त्या निर्णयाबद्दल काय वाटतं, या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, की त्यावेळचा तो निर्णय कदाचित चुकीचा असेल, आज मागे वळून पाहिल्यावर ते केलं नसतं तरी चाललं असतं असं वाटतं. पण जेव्हा सर्व लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात तेव्हा राजकारणात जगावं लागतं. मग गनिमी कावा करावा लागतो, त्यामुळे तो करण्यात आला. जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात आला नसता तर आमचं सरकार टिकलं असतं. आमच्याकडे आकडे होते. यावेळी मी हे केलं होतं ते बरोबर होतं."
 
पण ऐन वेळी शरद पवार यांनी भूमिका का बदलली, तुम्ही फडणवीस आहात म्हणून त्यांनी भूमिका बदलली का, असा प्रश्न पुढे परुळेकरांनी फडणवीसांना केला. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं, "फडणवीस आडनाव असल्याने काय काय भूमिका बदलतात हे मी आधीही पाहिलंय. अनेकांनी त्यांच्या भूमिका बदलल्यात. अनेकांनी माझ्या जातीचा उपयोग करून माझ्यावर हल्ला चढवलाय. ज्यांना माझ्यावर हल्ला करायला दुसरा कुठलाच मुद्दा गेल्या पाच वर्षात सापडलेला नाही त्यांनी जातीच्या आधारे माझ्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे त्यांचा पुरोगामित्वाचा बुरखा फाटला आहे."
 
अमित शाह यांनी फारसं लक्ष न घातल्यामुळेच राज्यात भाजपच सरकार येऊ शकलं नाही या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणतात, "अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करण्याचे शिल्पकार अमित शहा होते, ते माझ्या मागे भक्कम उभे आहेत."
 
दरम्यान राज्यात २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ मध्ये घडलेल्या घडामोडींबाबत आता आपण स्वतः पुस्तक लिहिणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.
 
"त्या 80 तासांमध्ये नेमकं काय घडलं याबाबत सध्या अनेक लोक आता पुस्तकं लिहित आहेत, खरं पुस्तक मी लिहिणार आहे, पत्रकारांनी लिहिलेली पुस्तकं बऱ्याच गृहितकांवर आधारित आहेत," असा दावा सुद्धा फडणवीसांनी केला आहे.
 
'विश्वासघाताचा सात्विक संताप'
उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेच्या वाटाघाटी सुरू असताना आपला फोन घेतला नसल्याचा आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
 
तसंच पालघरच्या जागेची अदलाबदल करतानाचा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार नाही हे उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट करण्यात आलं होतं, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
 
शिवाय अमित शहा आणि उद्धव ठाकरे त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाबाबत झालेल्या चर्चेत त्यांना कुठलंही आश्वासान देण्यात आलं नव्हतं याचाही फडणवीसांनी पुनरुरच्चार केला आहे.
 
शिवसेनेच्या वागण्याचा राग येतो का, या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणतात.
 
"शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा राग नक्की आला, लोकसभेला मी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मी काम केलं. विधानसभेला शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या बंडखोरांनी भरलेले फॉर्म मागे घेण्यासाठी मी मेहनत घेतली. त्यांच्या अनेक उमेदवारांना मदत केली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी विधानसभेला फक्त त्यांच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. पण मी तसं नव्हतं केलं. शिवसेनेच्या वागण्याचा मला राग आला, सात्विक संताप आला."
 
फडणवीसांचे शिक्कामोर्तब
23 ते 26 नोब्हेंबर 2019 महाराष्ट्रात घडलेल्या घडामोजडींबाबत आतापर्यंत तीन पुस्तकं बाजारात आली आहेत. या तीनही पुस्तकांबाबत बीबीसीनं आधी माहिती दिली आहे, ती तुम्ही इथं वाचू शकता.
 
त्यातीलच एक पुस्तक 'चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अॅन्ड लॉस्ट महाराष्ट्र'चे लेखक आणि पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "मी देवेंद्र फडणवीसांचे आभारच मानतो कारण 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, तसंच 2019 च्या निकालांनंतर शरद पवारच थेट भाजपशी सत्ता स्थापनेची चर्चा करत होते हे मान्य करून त्यांनी मी पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवर शिक्कामोर्तबच केलं आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे गृहितकं कुठली आहेत यावर चर्चा होऊ शकते."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामदेव बाबा यांच्या पतंजलीने कोव्हिडवर इलाज करण्याबाबत केलेल्या दाव्यात कितपत तथ्य?