Publish Date: Mon, 14 Oct 2019 (11:58 IST)
Updated Date: Mon, 14 Oct 2019 (12:01 IST)
दहशतवादाशी मुकाबला करण्याची पाकिस्तानची प्रामाणिक इच्छा असेल, तर त्यांच्या मदतीसाठी भारताचे सैन्य तिकडे पाठविण्याची आमची तयारी आहे. पण तसे करण्याची पाकिस्तानच्या नेत्यांची मानसिकता नसेल, तर दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद नष्ट करण्याची भारताची पूर्ण तयारी आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सोनपत (हरयाणा) येथील जाहीर सभेत सांगितले.
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतविरोधी प्रयत्न चालविले असले तरी, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. याउलट दहशतवाद्यांना पोसण्याचे धोरण पाकिस्तानने कायम ठेवले, तर त्या देशाची आणखी शकले होतील. याआधी 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन भाग झाले आहेत. त्यातून त्यांनी धडा घ्यावा, असे राजनाथ सिंह म्हणाले.