Publish Date: Tue, 30 Jul 2019 (10:56 IST)
Updated Date: Tue, 30 Jul 2019 (11:00 IST)
माझ्यात आणि रोहित शर्मामध्ये कसलेही मतभेद नाहीत असं स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने दिलं आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर त्यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती तसेच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने रोहित शर्मा आणि त्याच्या पत्नीला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं.
त्या वादावर विराट कोहलीने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
"मला एखादी व्यक्ती आवडत नसती, तर ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर अथवा वागण्यात दिसलं असतं. मी नेहमीच रोहित शर्माचं कौतुक केलं आहे, कारण तो एक चांगला खेळाडू आहे. आमच्यात काही मतभेद नाहीयेत. हा गोंधळात टाकणारा प्रकार आहे. यातून नक्की कुणाला फायदा होणार आहे, माहिती नाही," असं कोहलीनं म्हटलं आहे.
तर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलंय की, "विराट आणि रोहित यांच्यामध्ये काही वाद असता तर ते इतका उत्तम खेळ करू शकले नसते. त्यामुळे अशाप्रकारचा काही वाद त्या दोघांमध्ये नाहीये."
भारतीय संघ सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली.
या दौऱ्यात भारतीय संघ 2 ट्वेन्टी-20 सामने खेळून वेस्ट इंडिजमध्ये अखेरचा ट्वेन्टी-20 सामना खेळणार आहे. मग वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघ आणखी 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.