Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे यांचं आश्वासनं, 'ज्यांचं नुकसान झालं त्यांना व्यवस्थित भरपाई दिली जाईल'

उद्धव ठाकरे यांचं आश्वासनं, 'ज्यांचं नुकसान झालं त्यांना व्यवस्थित भरपाई दिली जाईल'
, शनिवार, 24 जुलै 2021 (17:14 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळये गावात दाखल झाले आहेत. ते दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.
 
उद्धव ठाकरे यांनी तळये गावाला भेट देऊन पाहणी केली. अतिशय दुर्गम भागातील या गावात शासन सर्व मदत करेल असं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं.
 
मुख्यमंत्री या गावाची पाहणी करत असतानाच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, "ज्यांचं नुकसान झालं त्यांना व्यवस्थित भरपाई दिली जाईल. याच्यापुढे अशा घटना घडू नयेत, घडल्या तर जीवितहानी होऊ नये अशाप्रकारच्या उपाययोजना सरकार करत आहे." ते पुढे म्हणाले, "केंद्रीय यंत्रणांकडून आवश्यक ती मदत मिळत आहे. बऱ्याचं ठिकाणचं स्थलांतर झालं आहे. अजून जिथं आवश्यकता आहे, तिथल्या नागरिकांचं स्थलांतर करू."
 
रायगडमधील दरड कोसळल्याच्या दोन घटनांमधील मृतांची संख्या 44 वर पोहोचली आहे. महाड तालुक्यातील तळये गावावर कोसळलेल्या दरडीखाली तीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केलीय. बचावकार्य अद्याप सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
तर दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या 35 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यात एकूण सहा ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये काल (23 जुलै) संध्याकाळपर्यंत एकूण 136 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल नियम