Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी दुसऱ्यांदा वजन उचललं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं पदक पक्कं झालं - मीराबाई चानू

मी दुसऱ्यांदा वजन उचललं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं पदक पक्कं झालं - मीराबाई चानू
, शनिवार, 24 जुलै 2021 (16:34 IST)
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं.
 
शुक्रवारी टोकियोत कोरोना नियमावलीचं पालन करत ऑलिम्पिक स्पर्धेचं उदघाटन झालं. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन भारताचं 28 सदस्यीय पथक सोहळ्यात सहभागी झालं होतं.
 
शनिवारी सलामीच्या दिवशी मीराबाईने रौप्यपदकावर नाव कोरत भारताला दमदार सुरुवात करून दिली. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तो कटू अनुभव, दुखापती हे अडथळे बाजूला सारत मीराबाईने पदकाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं.
 
"पदक पटकावल्याने प्रचंड आनंद झाला आहे. संपूर्ण देश माझा सामना पाहत होता. देशवासीयांच्या अपेक्षा माझ्यावर केंद्रित झाल्या होत्या. मी थोडीशी दडपणात होते. पण सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा निर्धार मी केला होता. या पदकासाठी मी अविरत मेहनत घेतली आहे. सुवर्णपदकावर नाव कोरण्याचा कसोशीने प्रयत्न केला. सुवर्णपदक जिंकू शकले नाही. पण मी सगळे प्रयत्न केले. मी दुसऱ्यांदा वजन उचललं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं पदक पक्कं झालं", अशा शब्दात मीराबाईने आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
आपण हे पदक आपल्या देशाला आणि आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या अब्जावधी भारतीयांना समर्पित करत असल्याचं मीराबाई चानूने ट्वीट करत म्हटलंय. 'माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यासाठी प्रचंड त्याग केला,' असं म्हणत मीरबाईने तिला मदत करणाऱ्या सरकारी संस्था आणि यंत्रणा, तिचे कोच आणि सपोर्ट स्टाफचेही आभार मानले आहेत.
 
मीराबाई चानूने मेडल पटकावल्यानंतर मणिपूरमध्ये घरी बसून ही स्पर्धा पाहणाऱ्या तिच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
 
2016मध्ये ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशा दुसऱ्या खेळाडू होत्या ज्यांच्या नावासमोर डिड नॉट फिनिश असं लिहिलेलं होतं.
 
जे वजन मीरा सराव करताना सहजपणे उचलत असत, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू त्यांचे हात जखडले होते. त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे खूप कमी भारतीयांनी बघितलं.
 
सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरल्या. 2016मध्ये तर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि दर आठवड्याला त्यांना मानसिक तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले.
 
या अपयशानंतर खेळाला रामराम ठोकावा असं एकदा मीराबाई यांच्या मनात आलं. पण त्यांनी माघार न घेता गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली.
 
48 किलोग्राम वजन असणाऱ्या मीराबाईंनी वजनाच्या 4 पट अधिक म्हणजे 194 किलो इतकं वजन उचलत मागील वर्षी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. मागील 22 वर्षांत असा विक्रम करणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.
 
48 किलो वजन कायम राहावं यासाठी मीराबाईंनी त्या दिवशी जेवणसुद्धा केलं नव्हतं. याच दिवसाच्या तयारीसाठी मीराबाई मागच्या वर्षी सख्ख्या बहिणीच्या लग्नातही गेल्या नव्हत्या.
 
बांबू वापरून वेटलिफ्टिंगचा सराव
8 ऑगस्ट 1994ला मणिपूर इथल्या छोट्या गावात मीराबाई यांचा जन्म झाला. इंफाळपासून त्यांचं गाव 200 किलोमीटर दूर होतं. त्याकाळी मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळायला गेल्या होत्या.
 
त्यांचा आदर्श मीराबाईंनी घेतला आणि सहा भावंडांत सर्वांत छोटी असलेल्या मीराबाईंनी वेटलिफेटर बनण्याचा निश्चय केला.
 
भारतीय हॉकी संघाने विजयी सलामी दिली. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव जोडीने आगेकूच केली आहे. सौरभ चौधरी पात्रता फेरीत दमदार प्रदर्शन करत आहे.
 
मीराबाईंच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. 2007मध्ये त्यांनी सराव सुरू केला तेव्हा लोखंडाचा बार नसल्यानं त्या बांबूच्या बारनं सराव करत असे.
 
गावात प्रशिक्षण केंद्र नसल्यानं सरावासाठी त्यांना 50-60 किलोमीटर दूर जावं लागायचं. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईंना तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबल्या नाही.
 
वयाच्या 11व्या वर्षी मीराबाई अंडर 15 चॅम्पियन होत्या आणि 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईंच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजुरानी यांचा 12 वर्षं जुना विक्रम मीराबाईंनी मोडीत काढला. 192 किलो वजन उचलून.
 
असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईंच्या आई-वडिलांजवळ पुरेशी साधनसंपत्ती नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती.
 
पण ही वेळ आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईंनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापुरात अतिमुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट, पुणे -बंगळूर महामार्ग पाण्याखाली