Publish Date: Sat, 25 Apr 2020 (12:32 IST)
Updated Date: Sat, 25 Apr 2020 (12:37 IST)
लॉकडाऊनमध्ये वाईन शॉप्स सुरू करावेत, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यावर आज शिवसनेचं मुखपत्र सामनातून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
"सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्र परिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात आणि बाजारात मद्य नसल्यानं मोठ्या वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तडफडणाऱ्या जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकार दरबारी मांडले आहे.
"राज्यातील लाख-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. राज ठाकरे यांच्या मद्यविक्रीला परवानगी द्यावी या मागणीमुळे घरोघरच्या रिकामच्या बाटल्या, प्यालेही फसफसू लागले आहेत," अशी टिप्पणी करत पुढे संपादकीयमध्ये एक शंका उपस्थित करण्यात आली आहे.
"राज ठाकरे यांनी जी मागणी त्यात दोन शंका आहेत. एक म्हणजे या मागणीमागे नक्की राज्याच्या महसूलाचाचा विचार आहे ना? की तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून राज यांनी ही मागणी केली आहे?" असा प्रश्न सामनाच्या संपादकीयमधून विचारण्यात आलाय.