Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज
, गुरूवार, 11 जून 2020 (21:08 IST)
संत तुकाराम महाराज हे इ. स. 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. यांचा जन्म इ. स. 1598 साली महाराष्ट्रातील देहू या स्थानी झाला. यांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) आहे. तुकोबा हे त्यांचे लाडाचे नाव असे.  
 
ते मोरे घराण्याचे होते. त्यांचा घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळपुरुष असून महान विठ्ठलभक्त होते. पंढरीची वारी करण्याची परंपरा त्यांचा घरात होती. त्यांचा वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते. हे तीन भाऊ होते मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता व कान्होबा धाकटा भाऊ होता.  
 
घरातील सर्व जबाबदारी तुकोबांवरच होती. यांचे पुण्याच्या अप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवळी) यांच्याशी प्रथम विवाह झाले. ह्यांना प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे शोषावे लागले. वयाच्या अवघ्या 17 -18 व्या वर्षी त्यांचे आई-वडील मरण पावले.  मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनास निघून गेला.  
 
तुकारामांना चार अपत्ये झाली. त्यांचा मोठा मुलगा संतू दुष्काळात मरण पावला. अन्य अपत्ये कन्या भागीरथी, काशी, मुले नारायण, महादेव. दुष्काळामुळे मुलगा संतू, गाय-ढोरे हे देखील गेली. संसारात विरक्ती आली. विठ्ठलावर आपली भक्ती कायम ठेवली. देहू गावाजवळ भंडारा डोंगरावर ईश्वराचे चिंतन करीत असताना त्यांना विठ्ठलांचा साक्षात्कार झाला.  
 
अशी आख्यायिका आहे. यांची पहिली बायको मरण पावल्यावर यांचा दुसरा विवाह अप्पाजी गुळवे यांची दुसरी कन्या नवलाई ( जिजाऊ) यांच्याशी झाला. जिजाऊ स्वभावाने खाष्ट असून त्यांनी तुकारामांचा संसार नीट सांभाळला. त्या पतिव्रता होत्या. त्यांनी तुकारामांची विरक्ती सांभाळली. तुकाराम ज्यावेळी आत्मचिंतनासाठी भंडारा डोंगरावर 13 दिवस बसलेले असताना त्यांची देखरेख जिजाऊनेच केली.  
 
तुकारामांचा व्यवसाय सावकारीचा होता. हा व्यवसाय परंपरागत होता. एकदा दुष्काळ पडला असताना त्यांनी सर्व कुळांना त्यांचा सावकारीतून मुक्त करून जमीन गहाळ ठेवल्याची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. 
 
अभंगाची रचना त्यांना प्रवचने कीर्तने करताना स्फुरू लागली. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड बंडखोर संत कवी होते. पारंपरिक वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला.  
 
संत तुकारामाची भाव कविताच अभंग होय. त्यांचे अभंग आजही लोकप्रिय असून खेड्यातील अशिक्षितांना नित्य पाठात आहे.  

आजही अभंगाची लोकप्रियता वाढतच आहे. हे भागवत धर्माचे कळस होते. त्यांचा अभंगात परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्राचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांचा काव्यातील गोडवा व भाषा रसाळ आहे.  
 
संत तुकाराम महाराजांनी आपलं गवळणीही रचल्या. पुण्याजवळ वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांनी संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेतून सांगितल्या बद्दल शिक्षेस्वरूप त्यांना त्यांचे सर्व अभंगाच्या गाथा इंद्रायणीत बडूवून द्यायला सांगितले. तुकोबांनी स्वहस्ते दगडाला सर्व वह्या बांधून पाण्यात बुडवल्या. तुकोबांना असह्य दुःख झालं. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला तेव्हा तेराव्या दिवशी भगवंताच्या कृपेने सर्व वह्या पाण्यावरती आल्या व तरंगू लागल्या.
 
फाल्गुन वद्य द्वितीयेला इ. स. 1650  महाराष्ट्रातील देहू येथे तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले. हा दिवस म्हणजे तुकाराम-बीजेचा होय.  

तुकाराम महाराज सांसारिक असूनही त्यांचे संपूर्ण आयुष्य परमार्थाकडे वळले. कर्जदारांचे कर्जमाफी करणारा हा जगातील पहिला संत होय. महात्मा बुद्धाने राजेश्वर्याचे त्याग केले तसेच तुकारामांनी संसारातील सुख दुःखाचा त्याग केला.  
 
मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञानज्योत संत ज्ञानेश्ववरांनी प्रज्वलित केली. ज्ञानेश्वर हे धर्म-क्रांतीचे पहिले संत होते. ज्ञानेश्वरांनंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकविला. त्या काळी बहुजन समाजामध्ये धर्म-कर्मकांडाची जळमटे पसरत होती. ती जळमटे तुकारामांनी आपल्या कीर्तनातून पुसली. ह्यांची अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात वसली. आपल्या अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला दिली. यांचे अभंग आजही गर्जत आहे.
 
 
संत तुकाराम यांचे काही अभंग....
 
आम्ही किंकर संतांचे दास। 
संत पदवी नको आम्हांस।।’ 
 
‘नरस्तुती आणि कथेचा विकरा।
 हें नको दातारा घडों देऊ ।।
 
दिवटय़ा, छत्री, घोडे। हें तों बऱ्यांत न पडे।।
आतां येथे पंढरीराया। मज गोविसी कासया।।
 
मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।।’
‘तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।।
कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।।’
 
‘कीर्तनाचा विकरा मातेचें गमन।
भाड खाई धन विटाळ तो।।
 
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ति।
इजवर पोट भरिती चांडाळ ते।।
 
अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना।
भाड हे खाईना जननीची।।
 
तुका म्हणे त्यांचें दर्शन ही खोटें।
पूर्वजासि नेटें नरका धाडी।।’
 
‘उभ्या बाजारांत कथा। हें तों नावडे पंढरीनाथा।।
अवघें पोटासाठीं सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।
 
लावी अनुसंधान। कांहीं देईल म्हणवून।।
काय केलें रांडलेंका। तुला राजी नाहीं तुका।।’
 
‘जेथें कीर्तन करावें। तेथे अन्न न सेवावें।।
बुका लावूं नये भाळा। माळ घालूं नये गळां।।
 
तट्टावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा।।
तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती।।’
 
‘कथा करोनियां द्रव्य देती घेती।
तयां अधोगति नरकवास।।’
 
‘कथा करोनियां मोल ज्यापें घेती।
तेही दोघे जाती नरकामध्यें।।’
 
‘म्हणवितां हरिदास कां रे नाहीं लाज।
दीनासी महाराज म्हणसी हीना।।
 
काय ऐसें पोट न भरेसें झालें।
हालविसी कुले सभेमाजीं।।’
 
आतां तरी पुढे हाचि उपदेश।
नका करूं नाश आयुष्याचा।।
 
सकळांच्या पायां माझें दंडवत।
आपुलालें चित्त शुद्ध करा।।’
बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाचवीत ऑनलाईन शिक्षण नकोच, कर्नाटक प्रशासनाचा निर्णय