‘दोबारा’चित्रपट ट्रेलर चर्चेत आहे. तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ‘मिराज’या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याचं कौतुक होताना दिसत आहे. प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र अनुराग कश्यप एवढ्यावर खूश नसल्याचं दिसून येतंय. मागच्या काही दिवसांपासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर ज्याप्रमाणे बहिष्कार टाकला जात आहे, त्याचप्रमाणे आपल्या चित्रपटावरही बहिष्कार टाकावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू त्यांच्या ‘दोबारा’चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यावेळी त्यांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट प्रमोशनच्या वेळी अनुराग कश्यप असं काही बोलला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने बहिष्काराच्या या ट्रेंडचा चित्रपटांना फायदाच होत असल्याचं म्हटलं आहे.