Publish Date: Sun, 12 Apr 2020 (11:06 IST)
Updated Date: Sun, 12 Apr 2020 (11:11 IST)
आज १८७ नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्णसंख्या १७६१ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यात आज कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १७६१ झाली आहे. कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ हजार ७७१ नमुन्यांपैकी ३४ हजार ९४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १७६१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत २०८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ८०० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४९६४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४६४१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी सतरा लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
आज राज्यात १७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे १२ तर पुणे येथील २ , सातारा, धुळे आणि मालेगाव येथील येथील प्रत्येकी १ आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १७ मृत्यूंपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर
तिघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या १७ पैकी १६ रुग्णांमध्ये (९४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांमध्ये क्षयरोग हा आजारही होता.