Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉकडाऊनच्या काळात ४१३ सायबर गुन्हे दाखल; २२३ जणांना अटक

लॉकडाऊनच्या काळात ४१३ सायबर गुन्हे दाखल; २२३ जणांना अटक
, सोमवार, 25 मे 2020 (09:02 IST)
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४१३ गुन्हे दाखल झाले असून २२३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.
 
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४०७ गुन्ह्यांची (ज्यापैकी २२ N.C आहेत) नोंद २३ मे २०२० पर्यंत झाली आहे.
 
सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७३ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्या प्रकरणी १६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २० गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ४५ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २२३ आरोपींना अटक केली आहे. यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे.
 
औरंगाबाद
औरंगाबाद सायबर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नोंद झालेला हा पहिला गुन्हा आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोनाग्रस्त रुग्णांबद्दल चुकीची माहिती व अफवा पसरविणारे पोस्ट व्हाट्सअपवरून पोस्ट केल्या. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये अफवा पसरून संभ्रम निर्माण झाला,तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
 
अफवांवर विश्वास ठेवू नका
सध्या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच व्हाट्सअप पोस्ट्समधून अफवा ,चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. अशा फॉरवर्ड मेसेजेसवर विश्वास ठेवू 
नका. सर्व व्हाट्सअप ग्रुप ऍडमिन्स ,ग्रुप निर्माते (owners)यांच्यावर विशेष जबाबदारी आहे की, या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर कोणत्याही चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या किंवा माहिती ,अफवा पसरणार नाहीत याची काळजी घ्या. जर कोणी ग्रुप मेंबर तुम्ही सांगूनसुद्धा ऐकत नसेल तर सदर व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाका. ग्रुप settings काही काळाकरिता ‘only admins‘ करा. एखादी खोटी बातमी किंवा चुकीची माहिती किंवा त्या प्रकारच्या पोस्ट्स असतील तर त्या विरुद्ध नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा व सदर माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) द्या .
 
केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका,  असे आवाहन सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सरकारने केरळला प्रशिक्षण डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची विनंती केली