Publish Date: Thu, 06 May 2021 (08:04 IST)
Updated Date: Thu, 06 May 2021 (08:05 IST)
देशात कोरोना मृत्यूसंख्या वाढली असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा या राज्यांमध्ये मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे, अशी चिंता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केली होती. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाच्या मृत्यूची संख्या बुधवारी वाढली आहे. राज्यात ५७ हजार ६४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ९२० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित एकूण संख्या ४८ लाख ८० हजार ५४२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७२ हजार ६६२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील ६ लाख ४१ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नोंद झालेल्या एकूण ९२० मृत्यूंपैकी ४१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८७ मृत्यू, पुणे-७९, नाशिक-६२, ठाणे-५३, नागपूर-१८, जळगाव-१२, नंदूरबार-१२, सोलापूर-१२, नांदेड-५, परभणी-५, रायगड-५, औरंगाबाद-४, वर्धा-४, हिंगोली-३, लातूर-३, अहमदनगर-२, चंद्रपूर-२, अमरावती-१, भंडारा-१, ज़ालना-१, उस्मानाबाद-१, सांगली-१ आणि वाशिम-१ असे आहेत.
तसेच ५७ हजार ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ४१ लाख ६४ हजार ९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३२ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८३ लाख ८४ हजार ५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख ८० हजार ५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ५२ हजार ५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३२ हजार १७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.