Publish Date: Thu, 25 Feb 2021 (07:53 IST)
Updated Date: Thu, 25 Feb 2021 (07:55 IST)
सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. बुधवारी राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत उच्चांकी रुग्णसंख्या असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासन यंत्रणा चिंतेत सापडली असून, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमो निर्माण झाले आहे.
बुधवारी राज्यात ८ हजार ८०७ नवे कोरोनाबाधित आढळून आले. मंगळवारी ६ हजार २१८ रुग्ण आढळून आले होते. बुधवारी त्यात २५८९ रुग्णांची भर पडल्याने, खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. तर कोरोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाल्यानेही चिंता वाढली आहे. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के एवढे आहे. राज्यात सध्या २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,४४६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अजून ५९ हजार ३५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती यासह इतरही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यावर नियंत्रण न आणल्यास पुढील काळात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.