Publish Date: Sat, 20 Mar 2021 (21:10 IST)
Updated Date: Sat, 20 Mar 2021 (21:13 IST)
राज्यात कठोर लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणाला वेग द्यायला हवा, असे मत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. कठोर लॉकडाऊनला आता सगळे कंटाळले आहेत. त्यामुळे गरिबांचे अतोनात नुकसान होते. कुठे रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता असल्यास निर्बंधयुक्त लॉकडाऊन करायला हवा. मात्र, कठोर लॉकडाऊन नको. शिवाय, आता लसीकरणाला वेग द्यायला हवा, असे फडणवीस नागपूर येथे म्हणाले.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे आता कठोर लॉकडाऊनपेक्षा निर्बंधयुक्त लॉकडाऊन केला पाहिजे. शिवाय, आता लसीकरण उपलब्ध असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.
नागपुरात केवळ ८८ केंद्रांतून सध्या लस दिली जात आहे, तर ग्रामीण भागात ७९ केंद्रांतून लस दिली जात आहे. एकट्या नागपूर शहरात प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे किमान १५१ लसीकरण केंद्रांची आवश्यकता आहे. ६० वर्षांहून अधिक आणि सहव्याधी असलेले ४५ वर्षांपेक्षा अधिक हा वयोगट लक्षात घेतला तरी नागपुरात ६ लाख ८७ हजार जणांना लसीकरण एप्रिलपूर्वी होणे आवश्यक आहे.