Publish Date: Mon, 21 Feb 2022 (08:27 IST)
Updated Date: Mon, 21 Feb 2022 (08:28 IST)
राज्यासह मुंबईत आता कोरोनाचा संसर्ग कमी होतोय असे चित्र समोर येत असलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. त्या मुंबईकरांना तर मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात आतापर्यत चौथ्यांदा शून्य मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यूदर घटत चालला आहे. हा महापालिकेसह मुंबईकरांना दिलासा आहे.
मुंबईत तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 2 जानेवारीनंतर दि. 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती.त्यानंतर 16 आणि 17 फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. 20 फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली असल्याने फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा ही नोंद झालेली आहे. शून्य मृत्यूची नोंद या महिन्यात आणखीन\ होण्याची शक्यता आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा पहिला रुग्ण हा मार्च २०२० मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ ला पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. या नंतर डिसेंबर २०२१ मध्ये देखील ७ वेळा शून्य मृत्यूंची नोंद झाली होती. आता फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 4 वेळा शून्य मृत्युची नोंद झालेली आहे.
मुंबईत 169 नवे रूग्ण
मुंबईत रविवारी 169 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर आज 286 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यत 10 लाख 34 हजार 493 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 1 हजार 151 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत.