Publish Date: Fri, 05 Jun 2020 (16:23 IST)
Updated Date: Fri, 05 Jun 2020 (17:03 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करु असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे रायगडमधील नुकसानाची पाहणी कऱण्यासाठी पोहोचले आहेत. पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी पॅकेज हा शब्द वापरणं टाळलं.
उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आपण पॅकेज जाहीर करणार नसून सध्या १०० कोटींची मदत जाहीर करत आहोत. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे कऱण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने आदेशाची वाट न पाहता कामाला सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर पुढील मदत जाहीर करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावं असं होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू असं सांगितलं.