Publish Date: Fri, 15 Jan 2021 (21:37 IST)
Updated Date: Fri, 15 Jan 2021 (21:46 IST)
राज्यात पाच जिल्हे वगळता अन्य कुठेही 'बर्ड फ्लू' चा संसर्ग झालेला नाही. ज्या कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला त्यांची संख्याही मोजकीच आहे, मात्र नियमानुसार काळजी म्हणून त्याच्या १ किलोमीटर परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येत असल्याने ती संख्या जास्त वाटते आहे असे स्पष्टीकरण पशूसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.
राज्यात लातूर,परभणी, बीड या जिल्ह्यांमधील मृत कोबड्यांचे काही नमुने तपासल्यानंतर त्यांच्यात लागण झाली असल्याचे आढळले. अशा कोंबड्या आढळलेल्या ठिकाणापासून १ किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केले जातात. याचा अर्थ नष्ट झालेल्या सर्वच कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला होता असा लावता येणार नाही.
लातूर मधील त्या ठिकाणच्या पोल्ट्री मधील ३ हजार ४४३, परभणीमध्ये १० हजार व बीडमध्ये ५ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे सध्या राज्यात फार मोठ्या प्रमाणावर बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव झाला आहे म्हणता येणार नाही असे डॉ. परकाळे यांनी सांगितले.