Publish Date: Thu, 20 Aug 2020 (18:50 IST)
Updated Date: Thu, 20 Aug 2020 (17:55 IST)
भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा असून या दिवशी कुमारिका आणि महिला व्रत करतात. हरितालिका व्रत केल्याने सौभाग्य येतं आणि कुमारिकांना मनोइच्छित वर प्राप्ती होते म्हणून मनोभावे हे व्रत केलं जातं. कुमारिका चांगला पती मिळावा तसेच विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, संसार सुखाचा व्हावा, यासाठी हे व्रत करतात. परंतू याचे काही कडक नियम देखील आहेत तर हे व्रत करताना हे नियम जाणून घेणे देखील आवश्यक आहे.
मान्यता आहे की एकदा हे व्रत करण्यास सुरुवात केल्यास आजीवन हे व्रत करावे.
या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपास केला जातो. अन्न-पाणी ग्रहण केले जात नाही.
या उपवासात रात्रभर जागरण करुन वाळूने तयार शिवलिंगाची प्रहराप्रमाणे पूजा करायची असते आणि रात्रभर जागून भजन-कीर्तन करावे.
व्रत दरम्यान हरतालिका व्रत कथा वाचणे किंवा ऐकणे अनिवार्य असल्याचे सांगितले गेले आहे. याशिवाय व्रत अपूर्ण मानले गेले आहे.
यादिवशी चुकूनही कोणाचा अपमान करणे आणि अपशब्द बोलणे टाळावे. मोठ्यांचा आदर करुन त्यांचा आशिर्वाद घेऊन पूजा करण्याचा नियम आहे.