Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mystery : तिरुपती बालाजी मंदिराचे दंग करणारे रहस्य

Mystery : तिरुपती बालाजी मंदिराचे दंग करणारे रहस्य
, बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (12:02 IST)
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती जवळ तिरुमला टेकडीवर वसलेले, येथे भगवान व्यंकटेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे जिथे भगवान विष्णूची पूजा केली जाते कारण तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचं अवतार असल्याचे मानलं जातं. तिरुपती बालाजी म्हणून त्यांची ख्याती आहे. तिरुमाला पर्वतावर असलेलं तिरुपती बालाजीचं मंदिर हे भारतातील मोठ्या तीर्थस्थळांपैकी एक आहे.
 
तिरुपती बालाजी मंदिरात भक्त खुल्या हाताने पैसे, दागिने, सोनंच नव्हे तर आपले केस देखील अर्पित करतात. तिरुपतीच्या चारही बाजूला असलेल्या डोंगररांगाना शेषनागाचे सात फण मानले जातात. या डोंगररांगाना सप्तगिरी असं म्हटलं जातं. श्री व्यंकटेश्वराचं मंदिर हे सप्तगिरीच्या सातव्या डोंगरावर आहे.
 
या हिंदू मंदिराची 10 चमत्कारी रहस्ये जाणून घ्या.
 
1. स्वामी पुष्कर्णी कुंड: श्री विष्णू काही काळ तिरुमला येथील स्वामी पुष्कर्णी कुंडाच्या काठावर वास्तव्यास होते. आजही हा कुंड अस्तित्वात आहे, ज्याच्या पाण्यानेच मंदिराची कामे पूर्ण होतात.
 
2. मूर्तीला घाम फुटतो: मंदिरातील बालाजीची जिवंत मूर्ती एका खास दगडाने निर्मित केलेली आहे. असे म्हटले जाते की बालाजीच्या मूर्तीला घाम फुटतो कारण घामाचे थेंब त्यांच्या मूर्तीवर स्पष्टपणे दिसून येतात. प्रत्येक वेळी बालाजींची पाठ स्वच्छ केल्यानंतर ही त्या भागात ओलावा जाणवतो. त्यामुळे मंदिरातील तापमान कमी ठेवलं जातं.
 
3. बालाजी स्त्री आणि पुरुष दोघांचे कपडे घालतात: असे म्हटले जाते की देवाच्या या रुपात देवी लक्ष्मीचाही समावेश आहे, म्हणूनच बालाजीला स्त्री आणि पुरुष दोघांचे वस्त्र घालण्याची परंपरा आहे. बालाजींना दररोज खाली धोतर आणि वर साडीने सजवण्यात येतं.
 
4. बालाजींचे केस खरे आहेत: असे म्हटले जाते की भगवान वेंकटेश्वरांच्या डोक्याचे केस खरे आहेत, जे कधीच गुंतत नाही. ते नेहमी रेशमसारखे मऊ राहतात. हे केस किती खरे आहेत याचे रहस्य सांगणे कठीण आहे.
 
5. बालाजींना काठीने मारहाण करण्यात आली: असे म्हटले जाते की येथे मंदिरात उजव्या बाजूला एक काठी ठेवली जाते ज्याने बालाजींना लहानपणी एकदा मारले गेले होते. काठीने मारल्यामुळे प्रभूंच्या हनुवटीवर जखम झाली होती. या कारणास्तव त्याच्या हनुवटीवर चंदनाचा लेप केला जातो. तसेच अनंताळवारजीच्या मारण्याने बालाजींच्या डोक्यावर देखील खुणा आहेत.
 
6. मूर्तीच्या आतून गूढ आवाज येतो: असे म्हटले जाते की जर तुम्ही भगवान वेंकटेश्वरांच्या मूर्तीला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला तर आतून समुद्राच्या लाटांसारखा आवाज ऐकू येतो. कसा आणि कोणाचा आवाज येतो, हे रहस्य अजूनही कायम आहे.
 
7. हृदयात लक्ष्मीजींची आकृती: दर गुरुवारी बालाजींचा लेप काढून, आंघोळ केल्यानंतर चंदनाचा लेप लावण्यात येतो. जेव्हा लेप हटवण्यात येतो तेव्हा बालाजींच्या हृदयात आई लक्ष्मीची आकृती दिसते.
 
8. दिवा कधीच विझत नाही: बालाजींच्या मंदिरात दिवा नेहमी जळत असतो. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या दिव्यामध्ये कधीही तेल किंवा तूप ओतले जात नाही. सर्वात आधी दिवा कोणी आणि कधी लावला हे देखील कुणालाही माहित नाही.
 
9. पचाई कपूर: भगवान बालाजींना पचाई नावाचं कपूर लावलं जातं. या कापूर बद्दल असे म्हटले जाते की जर ते कोणत्याही दगडावर लावले तर काही वेळात दगडांना भेगा पडतात, पण या पचाई कापूरचा बालाजीच्या मूर्तीवर कोणताही परिणाम होत नाही.
 
10. बालाजी गर्भगृहात मधोमध उभे दिसतात: जेव्हा आपण तिरूपती बालाजीला बाहेरुन पाहतो त्यावेळी ते गर्भगृहात मधोमध उभे असल्याचे दिसून येते. पण खरं तर बालाजीची मूर्ती ही उजव्या बाजूला एका कोपऱ्यात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shubh Muhurat September 2021: मालमत्ता खरेदी किंवा मुलांचे नामकरण सोहळा करण्यासाठी, हा शुभ काळ आहे