Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढीपाडवा माहिती : का साजरा करतात गुढीपाडव्याचा सण

गुढीपाडवा माहिती
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यामागील कारण आहे तरी काय जाणून घ्या-
 
गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर गडू बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. असे म्हणतात की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध केला 
 
होता. त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होतं. श्रीरामाने वालीच्या रुपात आसुरी शक्तींचा नाश केला होता आणि विजयोत्सव म्हणून गुढी सूचक आहे. 
 
या व्यतिरिक्त ब्रह्मदेवाने याच शुभ मुहूर्तावर सृष्टी निर्माण केली. तर मत्स्य रूप धारण करून भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध केल्याचे सांगितलं जातं. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच.
 
एक अजून कारण म्हणजे श्री शालिवाहन राजाने चैत्र शुद्ध प्रतीपदेपासूनच शके गणनेला सुरुवात केली असून मातीचे सैन्य तयार केले. सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यांवर पाणी शिंपडून प्राण फुंकले. सैन्याच्या मदतीने याच दिवशी शकांचा पराभव केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होत आणि नवीन वर्षाची सुरुवात होते. 
 
तसेच महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राकडून प्राप्त कळकाची काठी जमिनीत रोवून त्याची पूजा केली. नववर्ष प्रारंभीच्या दिवशी या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठला रेशमी वस्त्र घालून, श्रृंगार करुन पूजा करु लागले.
 
असे म्हणतात की याच दिवशी श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
 
तेव्हापासून विजय, धैर्य, त्याग, आनंद, आरोग्यादायी असे सूचित करणारा हा सण साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे तसंच या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी मुहूर्त न बघता केल्या जातात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

|| शरीरी वसे रामायण ||