महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायचे सत्पुरुष विष्णुबुवा जोग यांचा जन्म पुण्यात 14 सप्टेंबर 1867 रोजी झाला.त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. विष्णुबुवा यांना तीन भाऊ होते. त्यातील एक पांडोबा महाराज हे मल्ल होते. विष्णुबुवांना देखील लहानपणापासून मल्लविद्येची गोडी होती. ते नगरकर तालमीचे वस्ताद होते.
त्यांचे भाऊ पांडोबा महाराज हे अविवाहित होते. त्यांना पाहून विष्णुबुवा यांनी देखील लग्न केले नाही. ते फारसे शिकलेले नव्हते. पांडोबांसोबत आळंदीला जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या समाधीवर जाऊन माळ ठेऊन स्वतःच्या गळ्यात घालून वारकरी झाले. त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थांची स्थापना केली. आणि वारकरी सम्प्रदायाला पुढे वाढवण्याचे काम केले.
त्यांनी कीर्तन करण्यासाठी अभ्यास केला आणि आपल्या कीर्तनाने आणि प्रवचनाने अवघा महाराष्ट्र व्यापून घेतला. त्यांनी मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले.
ते नियमशील वारकरी होते. वारकरी सम्प्रदायची शिकवण आचरणात यावी हा त्यांच्या हेतू होता. ते आळंदीतील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक होते. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. ते लोकमान्य टिळक यांचे स्नेही होते. ते स्वदेशी वस्तू वापरायचे आणि टिळकांना यथाशक्ती मदत करायचे.
त्यांना बदनामीच्या अब्रुनुकसानीचा न्यायालयीन खटल्याला सामोरी जावे लागले. त्यांच्यावर हा खटला जळगाव कोर्टात भरवण्यात आला.त्यांचे शिष्य प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी विष्णुबुवांचे चरित्र प्रसिद्ध केले असून त्यामध्ये त्यांच्या उत्तम गुणांचे दर्शन दिले आहे. तसेच जळगावच्या खटल्याची हकीकत देखील आहे.
जोगमहाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ, साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष-उत्तरपक्षाची जोड दिली, त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाली. प्राचार्य शं.वा तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे अशा तरुणांपैकी एक. कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीला,1916 साली वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली.10 फेब्रुवारी1920 रोजी माघ कृष्ण प्रतिपदेला आळंदी येथे घासवले धर्मशाळेत विष्णूबुवा जोग यांची प्राणज्योत मालवली.