Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवस कशासाठी ?

नवस कशासाठी ?
काही मिळविणसाठी, काही प्राप्त करणसाठी लोक नवस का करतात देवाला? तेच समजत नाही. हाच प्रश्न पडतो. खरंतर परमेश्वराने एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे. जग सुंदर दिलं आहे, त्याचा उपयोग करून जगण्याची संधी दिली आहे तरी काही तरी मागण्यासाठी माणसं परमेश्वराला नवस का करतात? नवस करताना ज्यानं दिलं त्यालाच काही तरी देण्याचं आमिष का दाखवतात?
 
आपण जगत असताना दुसर्‍याचा विचार करून जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आनंद तर मिळेलच त्यापेक्षा आपले आयुष्य सुंदर होईल. अपेक्षा न ठेवता जगलो तर वेदना होणार नाही. दुसर्‍याला त्रास होणार नाही. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी, समाजसुधारकांनी आपल्याला हेच दाखवून दिलं आहे. सांगितलं आहे. शिकवलं आहे. तरीही आपण आपल्या वाटा चुकतो नंतर देवाला मागत सुटतो, दिलं नाही तर आमिष दाखवून नवस बोलतो, नवस करतो. हे नवस करताना आपण काय करतो हेच आपल्याला समजत नाही. तरीही लोक आज नवस करताना दिसून येतात. हे नवस केल्यावर तरी आपला हेतू साध्य होतो का? आपले स्वप्न पूर्ण होते का? सर्वाचे नवस पूर्ण होत असते तर आजचे जगही पूर्ण बदलून गेले असते. पण तसे होऊ शकत नाही. आनंद मिळण्यासाठी, मन:शांती मिळविण्यासाठी समाधान मिळण्यासाठी परमेश्वराची पूजा, भक्ती करण्यास विरोध नसावा, हरकत नसावी. ती ज्याला कराविशी वाटते त्याने ती करावी. ती कशी करावी हे ज्याचे त्याने ठरवावे. त्याला नियम किंवा पद्धत ही ज्याची त्याची असते. ती त्याने इतरांवर लादू नये. मार्गदर्शन करावे पण बळजबरी नको. त्याने कोण व्हावे? त्याने काय करावे? हे त्याने ठरवावे. तरीही त्यासाठी चांगले प्रयत्न जरूर हवेत. इच्छाशक्ती ठेवावी. परंतु वाममार्ग धरू नये. राजा हरिश्चंद्र, येशूख्रिस्त, गौतम बुद्ध यांच्या गोष्टी वाचल्या तर विचारांना योग्य दिशा मिळते. 
 
संत कबीर, संत गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज या सारख्या संतांच्या शिकवणीचा आपल्याला विसर होता कामा नये. 
 
आपल्या घरातील सर्वाना यांच्या आठवणी करून सतत त्यांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्यांच्या गोष्टींमुळे, शिकवणीमुळे आपले जीवन सुंदर होण्यास मदत होईल. जीवन आनंदमय होईल. मग देवाला नवस करण्याचा प्रश्नच येईल कसा? ज्याला नवस करतो तो काही जादूगार नाही. नवसाने सर्व काही मिळते असे नाही. तुमच्या आयुष्यात अगोदरच दिलेले असते. पण वेळ आल्यावर मिळते. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच मिळत नसते. हे आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. काही मिळविण्यासाठी प्रयत्न करू नये. दुसर्‍याचे अहित करू नये. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे. प्रेमाने जग जिंकता येते. तेव्हा नवस करू नयेत, नवसाला काही आधार नाही, हेच खरं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरतीत कापूर का लावतात?