Publish Date: Fri, 12 Nov 2021 (09:04 IST)
Updated Date: Fri, 12 Nov 2021 (09:04 IST)
आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती. या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभू विष्णू आणि शिव या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली. परंतू देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांची सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात. तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेल पत्र महादेवाला.
तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली. पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रकट झाले. तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जेवू घातले. नंतर स्वत: भोजन ग्रहण केले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.
एका आणखी कथेनुसार एका युगात एका वैश्यच्या पत्नीला पुत्र रत्न प्राप्ती होत नव्हती. तेव्हा तिने आपल्या शेजारणीचे ऐकून भैरव देवाला एका मुलाची बळी दिली. याचे उलट फळ भोगावे लागले आणि महिला कुष्ठ रोगाने ग्रसित झाली. यावर ती पश्चात्ताप करू लागली आणि रोगमुक्त होण्यासाठी गंगेच्या शरणी गेली.
तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन करण्याचा सल्ला दिला. गंगेच्या सांगितल्याप्रमाणे तिने पूजन करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाली.
या प्रभावाने तिला दिव्य शरीर आणि पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा पडली.