Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

5G म्हणजे काय? तुम्हाला पडलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं इथे पाहा

5G म्हणजे काय? तुम्हाला पडलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं इथे पाहा
, बुधवार, 15 जून 2022 (23:28 IST)
असं म्हटलं जातं की, भारतात 5G इंटरनेट सुरू झालं की गावागावांत इंटरनेट पोहोचेल! थोडक्यात येणारा काळ हा 5G चा असणार आहे. आणि त्यादृष्टीने आता भारतात पावलं टाकली जात आहेत. लवकरच भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू होण्याची चिन्हं आहेत. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी मंजुरी दिली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 10 पटीनं वाढणार असल्याचं म्हटलं जातंय.
 
पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, हेचं माहित नाहीये. किंबहुना 5G आल्यानंतर आपल्या आयुष्यात काय फरक पडू शकतो? याची ही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आता बरेच जण करत असतील. तर या सगळ्या शंकांचं निरसन करण्यापूर्वी 5G तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ.
 
1. 5G तंत्रज्ञान नेमकं काय आहे?
5G चं तंत्रज्ञान जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये वापरायला सुरुवात झालेली आहे. तसं बघायला गेलं तर भारतात 3G आणि 4G तंत्रज्ञान यायला तुलनेनं जास्त वेळ लागला होता. मात्र आता भारतात ही 5G तंत्रज्ञान आणण्याची तयारी सुरू आहे.
 
5G ही मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation) आहे. या नेटवर्कमध्ये मिलीमीटर वेव स्पेक्ट्रम 5G मध्ये महत्वाची भूमिका बजावतं. या मिलीमीटर वेव्हची लांबी 1 पासून 10 एमएम इतकी असते. त्यामुळे नेटवर्क हायस्पीड वर चालतं.
 
पण इतकंच पुरेसं नाही, तर 20Gbps चा स्पीड देणारे हे नेटवर्क 4G मोबाइलच्या 20 पट जास्त वेगवान आहे. असं समजा, तुमच्या खिशातचं फायबर ऑप्टिक कनेक्शन आहे.
 
2. 5G तंत्रज्ञान 4G पेक्षा चांगलं आहे?
हे तंत्रज्ञान 4G पेक्षा वेगळं आहे. 5G मुळे नव्या रेडियो टेक्निकवर काम करता येऊ शकतं. सध्या 4G वर आपल्याला हायस्पीड हा 45 एमबीपीएस पर्यंत मिळतो. पण प्रोसेसर चीप बनवणाऱ्या क्वालकॉम कंपनीच्या मते, 5G मुळे हा 45 एमबीपीएस पर्यंतचा स्पीड 10 ते 20 एमबीपीएसने वाढू शकतो.
 
 
पुर्वीच्या इतर सेल्युलर तंत्रज्ञानाप्रमाणेच 5G नेटवर्कदेखील रेडियोलहरींच्या सिग्नलवर अवलंबून आहे. हे सिग्नल अॅँटिना किंवा मास्टवरून तुमच्या मोबाईलवर पाठवले जातात. आपण कायम विद्युतचुंबकीय किरणांनी (electromagnetic radiations) वेढलेलो आहोत. टिव्ही, रेडियो याच लहरींवर चालतात. इतकंच नाही तर मोबाईल फोनसारख्या तंत्रज्ञानातही यांचा उपयोग होतो. अगदी सूर्यप्रकाशासारखा नैसर्गिक स्रोतही त्याला अपवाद नाही.
 
शहरी भागांमध्ये या लहरी कमी अंतर कापू शकतात. त्यामुळे 5G नेटवर्कला पूर्वीच्या नेटवर्कपेक्षा अधिक ट्रान्समीटर्स मास्टची गरज असते. ते तुलनेने जमिनीच्या अधिक जवळ उभारले असतात.
 
3. आता यासाठी तुम्हाला तुमचा फोन बदलावा लागेल का?
याचं उत्तर आत्ताच देता येणं कठीण आहे. बहुतेक बदलावा लागेल. कारण जेव्हा 4G आलं तेव्हा फोन बदलावा लागला होता. ही सेवा सिमकार्डशिवायही चालू शकेल असंही असू शकतं. अनेक कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. हे तंत्रज्ञान गावांगावांत पोहोचू शकतं पण सगळ्यांना हे परवडणारं असेल की नाही हे आत्ताच सांगणं कठीण आहे.
 
4. यूजर्सना 5G तंत्रज्ञानाचा काय फायदा मिळेल?
या तंत्रज्ञानामध्ये हायस्पीड नेटवर्क, एचडी सर्फिंग अशा बऱ्याच गोष्टी यूजर्सना अनुभवायला मिळतील. या तंत्रज्ञानामुळे हायस्पीड इंटरनेट सेवा मिळेल आणि त्यामुळे युजर्स एखादी फिल्मही अगदी काही सेकंदांत डाऊनलोड करु शकतील. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करायचं, पण 5G सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल.
 
4G मोबाईल एखादी माहिती पाठवण्यासाठी 70 मिलीसेकंदांचा वेळ घेतात. मात्र 5G मोबाईल आल्यानंतर एका मिलीसेकंदांपेक्षाही कमी वेळात माहितीची देवाणघेवाण करता येईल.
 
पूर्वीच्या मोबाईल नेटवर्कच्या तुलनेत 5G तंत्रज्ञानात दीर्घ लहरींचा वापर करण्यात येतो. त्यामुळे एकाचवेळी अधिकाधिक उपकरणांना इंटरनेट मिळू शकतं. शिवाय, इंटरनेटचा स्पीडही जास्त असतो.
 
5. 5G तंत्रज्ञानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो का?
तर 2019 साली जेव्हा ब्रिटनमधल्या काही शहरांमध्ये 5G मोबाईल सेवा वापरायला सुरुवात झाली तेव्हापासूनच 5G तंत्रज्ञानाचा आरोग्यावर दुष्परिणाम होईल का, हा प्रश्न पुढं आला. भारतात सुद्धा अभिनेत्री जूही चावलाने अशीच टीका केली होती.
 
जून 2021 मध्ये तिने 5G च्या रेडिओफ्रिक्वेन्सी रेडिएशनच्या घातक परिणामांबद्दल आणि भारतातील वापराविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
5G चं नाही तर यापूर्वी देखील मोबाईल फोन टेक्नॉलॉजीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींचा आरोग्यावर परिणाम होतो का यावरून वाद सुरू झाले होते. या रेडिएशन मुळे काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची भीती अनेकांना वाटते. पण 2014 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्टीकरण दिलं होतं की, "मोबाईल फोनच्या वापरामुळे आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होत असल्याचं आढळलेलं नाही.
 
असं असलं तरी इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) या संस्थेसह जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रेडियो फ्रिक्वेंसी रेडिएशनमुळे (ज्याचा मोबाईल सिग्नल हादेखील एक भाग आहे.) 'कॅन्सर होण्याचा धोका उद्भभू शकतो' असं म्हटलेलं.
 
2018 साली देखील असंच झालं होतं. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने टॉक्सिकोलॉजीसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालातही यावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. या संशोधनात रेडियो फ्रिक्वेंसी रेडिएशनमध्ये ठेवलेल्या उंदरांच्या हृदयात कॅन्सरसारखी गाठ तयार झाल्याचं आढळलं होतं.
 
मात्र हे संशोधन करणाऱ्या एका जेष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितलं की, एखादी व्यक्ती मोबाईलचा अतिवापर करत असली तरीदेखील त्याची थेट तुलना या रिसर्चशी करता येणार नाही.
 
आता सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणं ही सुद्धा या घातक श्रेणीत येतात. त्यांच्यामुळे त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या एक्सरे, गॅमारे यांचं रेडिशन लेव्हल सुद्धा इतकी जास्त असते की याचा माणसाच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.
 
यावर ब्रिटनचे डॉ. ग्रीम्स म्हणाले होते की, "कॅन्सरच्या धोक्याविषयी लोकांना काळजी आहे. मात्र हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की, जो प्रकाश आपल्याला दिसतो, त्यापेक्षा रेडिओ लहरीची उर्जा खूप कमी असते. आणि मोबाईल फोन किंवा वायरलेस नेटवर्कमुळे आरोग्यावर परिणाम झाला आहे, यासाठीचे ठोस पुरावे अजून तरी उपलब्ध नाहीत."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची सून आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांना जीवे मारण्याची धमकी