Publish Date: Mon, 20 May 2019 (16:34 IST)
Updated Date: Mon, 20 May 2019 (16:39 IST)
चंद्राबाबू नायडू सध्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. चंद्राबाबूंच्या याच भेट सत्रावर शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून टीका करण्यात आली आहे. बनावट चाव्या वापरून दिल्लीचं दार उघडण्यासाठी विरोधी पक्षनेते कामाला लागले आहेत. याच मोहिमेचं नेतृत्व खुद्द चंद्राबाबू करत असल्याचं अग्रलेखातून म्हटलं आहे. 'अनेक कुबड्यांच्या आधारे सरपटणारे पंगू सरकार देशाला परवडणार नाही, असं थेट शब्दांत या अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे. 'अमित शाह यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजपा स्वबळावर ३०० जागा जिंकेल आणि तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला..' त्यातही योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार ४०० पार’ची खात्री दिली होती. त्यामुळे हे एकंदर वातावरण पाहता चंद्राबाबू स्वतःची दमछाक का करून घेत आहेत? असा प्रश्नही शिवसेनेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.