Publish Date: Thu, 14 Mar 2019 (18:23 IST)
Updated Date: Thu, 14 Mar 2019 (17:25 IST)
लोकसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण जोरदार तापले असून, भाजपा आपल्या राजकीय चालीतून विरोधकांना गारद करत आहे. भाजपा नेते गिरीश महाजन म्हणाले की आता विरोधकांची मुलेच नव्हे, तर नातवंडेही पळवणार आहोत, असे सांगताना आपली मुले आमच्याकडे का येतात, याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे, असा सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. भाजप मध्ये इतर पक्षातून येणारे अधिक असून सध्या भाजपा जोरात आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंच्या प्रवेशानंतर आता मुले पळवणारी टोळी आली असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्यानेत्यांनी सावध राहावे, असे ट्विट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
आज एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांना याबद्ल प्रश्न विचारला तेव्हा महाजन म्हणाले की, आता आम्ही मुलेच नाही, तर नातवंडेही पळवू, असा इशारा दिला. त्यांची मुले, नातवंडे ते सांभाळू शकत नाहीत का? असे विचारत असे का होते, आता विरोधकांनी स्वतः पक्षाचे आत्मपरीक्षण करावे, काही पक्षांत आमचे घर म्हणजेच आमचा पक्ष असे समीकरण केले आहे, मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? असाही टोला महाजन यांनी लगावला आहे. सुजय विखे-पाटील यांच्यामागे विखे-पाटील यांचा मोठा वारसा आहे. ते मोठे संस्थानिक आहेत. त्यांच्याकडील कुणी आमच्याकडे येत असतील, तर त्यांचे स्वागत आम्ही करणार आहोत.
त्यांनीही धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नाना पटोले यांना पळवले नाही का? असेही महाजन यांनी विचारले आहे. त्यामुळे आता भाजपा विरोधात आघाडी हा मोठा संघर्ष उभा राहिला आहे.