Publish Date: Wed, 16 May 2018 (08:05 IST)
Updated Date: Wed, 16 May 2018 (08:10 IST)
भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतल्याच्या वृत्तानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकासाचे राजकारण आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क साधत केलेली व्युहरचना यामुळेच हा विजय मिळाला असून भाजपला दिलेल्या कौलाबद्दल आम्ही जनतेचे आभार मानतो. काही जण पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पहात आहेत त्यांना कर्नाटकातील जनतेने त्याबद्दल योग्य प्रत्युत्तर दिले आहे असेही त्यांनी नमूद केले.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय आहे. कर्नाटकातील जनतेने मोदींच्या विकासाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तेथील लोकांनी समाज विघातक, विषारी आणि नकारात्मक राजकारण नाकरले आहे. भाजपचे आणखी एक नेते नितीन गडकरी यांनीही या निकालाचे स्वागत करताना म्हटले आहे की आम्ही बघितलेले कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न खरे होताना दिसत आहे. कॉंग्रेसच्या राजकारण शैलीवरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की कॉंग्रेस भाजपला केवळ विरोधाच्या भावनेतूनच विरोध करीत आहे.