Publish Date: Tue, 06 Aug 2024 (18:49 IST)
Updated Date: Tue, 06 Aug 2024 (18:52 IST)
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू सोमवारी हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलताना आक्रमक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गणपती करू, समुद्रात उचलून टाकू असं विधान केलं होत. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं होत. आता या विधानावर बच्चू कडूंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, आम्ही आता आगामी विधानसभेत निवडणूक लढवणार आहो.
येणाऱ्या निवडणुकीत आमचे 20 आमदार निवडून आले आणि शेतकरी, मंजुरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू असं माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. असे स्पष्टीकरण बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना दिलं.
ते पुढे म्हणाले, आमच्या दिव्यांग आणि शेतमजुरांच्या आंदोलनात महाराष्ट्रातून लोक येणार असून येत्या 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आंदोलन असून हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे.
भाजप हिंदुत्वाचा नारा देत आहे तर काँग्रेस जातीचे नारे देत आहे. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांचा नारा देत आक्रोश मोर्चा काढत आहे.
आमदार कडू हे महायुतीत आहे. त्यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला होता त्यांनी अनेकदा महायुती सरकारवर टीका केली होती. त्यांची भूमिका विधानसभेला काय असणार या कडे सर्वांचं लक्ष वेधले आहे.