Publish Date: Mon, 14 Oct 2019 (16:06 IST)
Updated Date: Mon, 14 Oct 2019 (16:08 IST)
राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. आदित्य ठाकरेंसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, शिवसेनेची इच्छा असेल तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल असं सांगितलं.
निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाचा असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. तसंच ज्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही, तेदेखील महत्त्वाचे आणि पक्षासाठी मेहनत घेणारे नेते असल्याचं त्यांनी सांगितलं. ते वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
“पक्षाने गेल्या पाच वर्षात चांगलं काम केलं आहे. मला आज कोणतीही भीती वाटत नाही, कारण माझ्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष भक्कमपणे उभे आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “शिवसेनेकडून आम्हाला कोणताही त्रास नाही, ते आमचे मित्र आहेत. मित्राकडून कधी आपल्याला त्रास होतो का?” अस त्यांनी सांगितले.