Publish Date: Sat, 12 Oct 2019 (10:58 IST)
Updated Date: Sat, 12 Oct 2019 (11:11 IST)
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्याची आमची इच्छा होती. मात्र काँग्रेसमुळं त्यांच्या पक्षाला आघाडीत घेऊ शकलो नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि काँग्रेस वगळता इतर पक्षांचा पाठिंबाही होता. मात्र राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकेमुळं काँग्रेस त्यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
राज ठाकरेंना आघाडीत घेता आलं नाही, याबद्दल वाईट वाटत असल्याचंही अजित पवारांनी नमूद केलं.
दरम्यान, दुसरीकडे भांडुपमधील सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्याला हात घातलाय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
"मुंबईत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा ठीक आहेत, पण चौथी भाषा कुणी आणत असेल, तर बांबूचे फटके दिले जातील," असं राज ठाकरे म्हणाले. वरळीमध्ये शिवसेनेनं गुजराती, तामिळ इत्यादी भाषांमधून केलेल्या पोस्टरबाजीवरही राज ठाकरेंनी टीका केली.
जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तेव्हा अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं की समान विचारधारा असलेल्या लोकांनाच आघाडीत स्थान राहील. मनसेनी काही मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करावी असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं.