Publish Date: Fri, 14 Jan 2022 (12:18 IST)
Updated Date: Fri, 14 Jan 2022 (12:24 IST)
कणभर तिळ गुळ कुणाला देण्याची कल्पना कशी वाटते ना...पण आपण द्यावं ... कुणाला देताना चांगलं द्यावं...असेल त्यातलं समोरच्याला देणं ही सुद्धा कला आहे...चांगला भाग दिला तर त्या चांगल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचतात... थेट त्याच्या हृदयाला हात घालतात ..... कणभर तीळ आणि गूळ समोरच्या पर्यंत पोहोचला तर त्यातून मण भर आपला आतला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि आपलेपणा अधिकच गहिरा होतो...
आपलेपणाचा गहिरा रंग असलेली मैत्री..... असलेलं नातं अधिकच दृढ होण्यास मदत होते .......पण म्हणून या तीळ गुळासाठी वर्षातला एकच दिवस काय म्हणून ठेवायचा... नेहमीसाठीच या भावना जपूया आणि नातं अधिकच वृद्धिंगत करूया ....संक्रांतीचे फक्त निमित्त पण हे निमित्त आपल्या भावना जपण्यासाठी कारणीभूत ठरतं हे कारणही जपूया ....
या कोरोना काळात जेव्हा माणूस माणसापासून दुरावल्या सारखा झालाय....त्या काळातच खरंच खूप आत्मभान आलंय त्याला अस म्हणेनात..पण जीवनात खरंच जिव्हाळ्याची आपली माणसं किती महत्त्वाची हे खूप चांगल्याने समजलंय ...हे मात्र नक्की...मग हा जिव्हाळा..ही मैत्री..हे माणूसपण जपू यात...
सूर्याच्या मकर संक्रमणाच्या निमित्ताने जसा सूर्याचा प्रकाश..... सूर्याच तेज कणाकणाने वाढत जातं आणि ते तेजोवलय आपल्यापर्यंत पोहोचून आपलं अंतर्मन लख्ख प्रकाशित करत.... तद्वतच तिळगुळाच्या गोडीने आणि प्रकाशाच्या तेजाने आपला आयुष्य उजळून जाऊ जावो या शुभेच्छा....
मकर संक्रमणाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि सस्नेह नमस्कार
- माधवी