Publish Date: Fri, 04 Jun 2021 (16:00 IST)
Updated Date: Fri, 04 Jun 2021 (16:02 IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. ते राज्यभर दौरा करून अनेक नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या पाठोपाठच अनेक संघटना देखील आता आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपा नेते नारायण राणे यांनी या संभाजीराजेंवर या मुद्यावरून टिप्पणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी ट्विटद्वारे इशारा दिल्याचे दिसत आहे.
“छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल, तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.” असं संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.