Publish Date: Fri, 26 Jul 2019 (08:36 IST)
Updated Date: Fri, 26 Jul 2019 (08:42 IST)
सध्या देशातील ऑटोमोबाईल उद्योगात मोठ्या प्रमाणात मंदीसदृश्य वातावरण असून त्याचा थेट थेट परिणाम ऑटो पार्ट्स क्षेत्रावर होतो आहे. एकीकडे वाहनांची विक्री कमी झाली असून, त्यामुळे या ऑटो पार्ट्स क्षेत्रातील १० लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यामुळे सरकारनं ऑटो मोबाईल उद्योगावर लावलेल्या जीएसटीमध्ये त्वरित बदल करावे व दिलासा द्यावा, अशी मागणी ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं सरकार कडे केली आहे.
ऑटो पार्ट्स क्षेत्रात जवळपास ५० लाख कामगार सध्या काम करत असून, जीएसटीमुळे गेल्या १० महिन्यांपासून वाहनांची मोठ्या प्रमाणत विक्री घटली, त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राचा भाग असणाऱ्या सर्व उद्योगांवर सारखाच जीएसटी लावण्याची मागणी ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून (एसीएमए) केली आहे. 'जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री घटली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा प्रकारची समस्या याआधी कधीही उद्भवली नव्हती,' असं एसीएमएचे अध्यक्ष राम व्यंकटरमणी यांनी सांगितलं आहे. जर याचा फटका बसला तर देशातील लाखो लोग बेरोजगार होतील आणि स्थिती गंभीर होईल असे चित्र आहे.