Publish Date: Tue, 14 Mar 2017 (17:31 IST)
Updated Date: Tue, 14 Mar 2017 (17:37 IST)
सालाबादप्रमाणे चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तीन विभागातून सर्वोत्कृष्ट कलाकृतींना तसेच कलावंतांना नावाजल्या जाणाऱ्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी महोत्सवाचा बिगुल यंदाही वाजला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे सतरावे वर्ष असून, यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नाट्य विभागातून सर्वोत्कृष्ट सात नाटकांची निवड करण्यात आली आहे, यात साखर खाल्लेला माणूस (एकदंत निर्मित), कोडमंत्र (अनामिका निर्मित), या गोजिरवाण्या घरात (वेद प्रॉडक्शन), छडा(अवनीश प्रॉडक्शन), यु टर्न २ (जिव्हाळा निर्मित), तीन पायांची शर्यत(सुयोग /झेलू निर्मित), के दिल अभी भरा नही (वेद प्रॉडक्शन) या नाटकांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण २४ नाटकांनी सहभाग घेतला होता. नाट्य परिक्षण विभागातील कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रमोद पवार यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली आहे.
यंदाचा नाट्य महोत्सव ८ ते १० एप्रिल रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात रंगणार आहे. पुरस्कारासाठी झालेल्या प्राथमिक निवड प्रक्रियेतील सात नाटकांपैकी यु टर्न २ आणि तीन पायांची शर्यत ही दोन नाटकं काही तांत्रिक कारणांमुळे नाट्यमहोत्सवात दाखवले जाणार नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना कमी दरांत सदर नाटक पाहता येणार आहे. तसेच लवकरच चित्रपट विभागातील पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोकृष्ट १० चित्रपटांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण अध्यक्ष -संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली
webdunia
Publish Date: Tue, 14 Mar 2017 (17:31 IST)
Updated Date: Tue, 14 Mar 2017 (17:37 IST)