Publish Date: Fri, 10 Apr 2020 (22:02 IST)
Updated Date: Fri, 10 Apr 2020 (22:05 IST)
देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या गंभीर वातावरणात स्थिती लगेच सामान्य होताना दिसत नाहीये. अशात बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता 15 एप्रिलनंतरही स्पर्धा सुरु होईल की नाही हे सांगणे जरा कठिणच आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय आयपीएलसाठी नवीन वेळापत्रक आखता येईल का याची चाचपणी करत आहे.
कारण ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे. परंतू यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा खेळवायची की नाही यावर अनेक मतमतांतर आहेत.
एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या आयपीएलसाठी नवीन पर्यायांचा विचार करत आहे. ही स्पर्धा अजून दोन-तीन महिने पुढे ढकलता येईल का या पर्यायावर विचार केला जाऊ शकतो. तसेच पूर्वी झालेल्या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने 15 एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आयपीएलचा हंगाम छोटेखानी स्वरुपात खेळवाला लागेल असे संकेत दिले होते.