Publish Date: Sun, 15 Mar 2020 (12:10 IST)
Updated Date: Sun, 15 Mar 2020 (12:13 IST)
कोरोना विषाणुच्या धसक्याने बीसीसआयने सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्वच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
रणजी करंडक स्पर्धेची शुक्रवारी अंतिम फेरी खेळवण्यात आली. पण आता या स्पर्धेनंतर एकही स्पर्धा न भरवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे आजपासून बीसीसीआयच्या अंतर्गत कोणत्याही स्थानिक स्पर्धा खेळवण्यात येणार नाहीत. कोरोना व्हायरसमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबरची मालिका शुक्रवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. तोपर्यंत जर कोरोना व्हायरसचा प्रसार थांबला नाही, तर आयपीएलही रद्द करण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.