Publish Date: Thu, 16 Apr 2020 (22:26 IST)
Updated Date: Thu, 16 Apr 2020 (22:29 IST)
देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे हे लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने यासंदर्भात एक परिपत्रक जाहीर केलं आहे. ज्यात परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धा खेळवण्यासाठी योग्य वातावरण असेल तरच आयपीएल खेळवलं जाईल असं म्हटलं आहे.
बीसीसीआय, आयपीएल संघमालक, टेलीकास्ट करणारं चॅनल आणि इतर समभागधारक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की स्पर्धेसाठी योग्य वातावरण तयार झालं तरच आयपीएल खेळवण्याबद्दल विचार केला जाईल. भविष्यात केंद्र, राज्य सरकार आणि सर्व संबंधित यंत्रणांशी सल्लामसलत केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.
29 मार्च रोजी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. मात्र केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केल्यानंतर ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दरम्यान पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊनची कालावधी वाढवण्यात आल्यामुळे बीसीसीआयने अखेरीस हा निर्णय घेतला आहे.