Publish Date: Thu, 12 Nov 2020 (16:44 IST)
Updated Date: Thu, 12 Nov 2020 (16:45 IST)
भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन यूएईत केले. दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसरंदा विजेतेपद पटकावला.
तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेच पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे. बीसीसीआय पुढील हंगामासाठी लिलाव आयोजित करण्याचा तयारीत असून पुढील हंगामात आणखी एक संघ जोडला जाण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयचे अधिकारी संघमालकांच्या संपर्कात आहेत.
2021 च्या हंगामासाठी बीसीसीआय सर्व खेळाडूंचे मेगा ऑक्शन करण्याच्या तयारीत होते. परंतु करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने लिलाव करण्याचा विचार स्थगित केला होता. तेराव्या हंगामाच्या यशस्वी आयोजनानंतर बीसीसीआयने पुढील हंगामाच्या लिलावासाठी पावले उचलायला सुरुवात केल्याच समजते. एप्रिल- मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन भारतातच करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या आधीच्या आयोजनाबद्दलचे संकेत दिले आहेत. सर्व गोष्टी जुळून आल्या तर पुढील हंगामात अहमदाबादचा संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकेल.