Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताची किवींसवर मात

भारताची किवींसवर मात
दिल्ली , सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (10:31 IST)
आक्रमक फलंदाज विराट कोहलीने वैयक्तिक शतक झळकावत कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह तिसर्‍या गड्यासाठी रचलेल्या १५१ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या बळावर भारताने सात गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजयाची नोंद केली. भारताने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत या विजयाने २-१ अशी आघाडी घेतली. कारकीर्दीतले २६ वे शतक झळकावणार्‍या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
मुंबईकर अजिंक्य रहाणेचे अपयश तिसर्‍या सामन्यातही कायम होते. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने त्याला ५ धावांवर तंबूत पाठवले. त्याचाच कित्ता गिरवत रोहित शर्माही माघारी परतला. साऊथीने त्याला १३ धावांवर  (पान १ वरून) पायचित पकडले. परिणामी, पन्नाशीच्या आत भारताने दोन आघाडीचे फलंदाज गमावले. न्यूझीलंडविरुद्धच्या आतापर्यंतच्या दोन सामन्यांत चौथ्या क्रमांकावर मनीष पांडे खेळण्यास उतरत होता. मात्र, कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळण्यास आला. कर्णधार धोनीने उपकर्णधार विराट कोहलीला साथीला घेत किल्ला लढवला. गेल्या सामन्यात संथ फलंदाजीवरून महेंद्रसिंग धोनीला लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, त्याने आपल्यावरील डाग पुसत दमदार फलंदाजी केली. कोहलीपेक्षा धोनीच आक्रमक फलंदाजी करत होता. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी शतकीय भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला. महेंद्रसिंग धोनीला ८0 धावांवर बाद झाला. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. कोहलीने वेगवान गोलंदाज ट्रेण्ट बोल्टच्या षटकात २२ धावांची बरसात करत भारताच्या माथी विजयाचा टिळा लावला. कोहली अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने १३४ चेंडूंत १६ चौकार आणि १ षटकाराने १५४ धावा काढल्या. मनीष पांडेने २८ धावा काढत त्याला साथ दिली.
 
तत्पूर्वी, जेम्स निशम आणि मॅट हेन्री यांनी नवव्या गड्यासाठी रचलेल्या ८४ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे न्यूझीलंडने तिसर्‍या सामन्यात सर्वबाद २८५ धावा उभारल्या. केदार जाधव आणि उमेश यादवच्या मार्‍यापुढे न्यूझीलंडची ८ बाद १९९ अशी परिस्थिती झाली होती. मात्र, निशम आणि हेन्री यांनी अखेरच्या १0 षटकांत आठच्या सरासरीने धावा काढत सामन्याचे रूपडे पालटले. निशम आणि हेन्री यांनी अनुक्रमे ५७ आणि ३९ धावा केल्या.
 
भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला पहिला बळी मिळवण्यासाठी सात षटकांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. उमेश यादवने सलामीवीर मार्टिन गपटिलला पायचित पकडले. त्याने २१ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा काढल्या. कामचलाऊ गोलंदाज केदार जाधवने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला २२ धावांवर माघारी धाडले. दोन फलंदाज बाद झाल्यावर लॅथम आणि रॉस टेलर यांनी सावधपणे फलंदाजी केली. दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी रचली. अमित मिश्राने ४४ धावांवर रॉस टेलरला बाद करत ही भागीदारी फोडली. एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेला जेम्स अँडरसन पुन्हा अपयशी ठरला. यष्टिरक्षक ल्युक रोंचीही १ धावा काढून बाद झाला. या दोघांना केदार जाधवने तंबूत धाडले. सँटनर आणि टिम साऊथी यांना अनुक्रमे बुमराह आणि यादवने बाद करत न्यूझीलंडच्या धावांना लगाम घातला. आठ फलंदाज बाद झाल्यामुळे न्यूझीलंडचा डाव २५0 धावांपर्यंत गुंडाळू, असा विश्‍वास धोनी आणि कंपनीला होता. मात्र, निशम आणि हेन्री यांनी सावधपणे फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. निशमच्या खेळीत ७ चौकारांचा समावेश होता. त्याने कारकीर्दीतले पहिले अर्धशतक झळकावले. बुमराह आणि मिश्राने प्रत्येकी २ बळी घेतले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रथमच महाराष्ट्रा येथे वर्ल्ड पीस अर्थात जागतिक शांतता परिषदेचे आयोजन