Publish Date: Sat, 08 Jul 2017 (09:29 IST)
Updated Date: Sat, 08 Jul 2017 (09:31 IST)
२ एप्रिल २०११… स्थळ मुंबईचे वानखेडे स्टेडियम.. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात विश्वकरंडकाचे दावेदार होण्यासाठीचा अंतिम सामना सुरु होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर २७५ धावांचे आव्हान ठेवलं होतं. सचिन आणि सेहवाग बाद झाल्यावर विराट व गंभीरने भारताच्या डावाला सावरलं होतं. पण एका क्षणी तिलकरत्ने दिलशानने टाकलेल्या चेंडूवर विराट बाद झाला. आणि स्टेडियम मध्ये सगळेच संपुर्ण विश्वकरंडकामध्ये फॉर्म मध्ये असणाऱ्या युवराज सिंगची वाट पहात होतं.
पण त्यावेळी आपल्या टीमचा कर्णधार असणारा कॅप्टन कूल धोनीच्या मनात काही तरी वेगळंच चाललं होतं. विराट बाद झाल्यावर त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या गॅरी कर्स्टन यांना महेंद्रसिंग धोनीने त्याचा निर्णय सांगितला… युवराजच्या आधी धोनी स्वतः फलंदाजीसाठी उतरणार होता… आणि त्याने लगेचच तो अंमलात आणला देखील. आणि पुढे काय झालं हे आपल्याला माहितीच आहे. धोनीने नाबाद ९१ धावा करून जबरदस्त अशा खेळाचं प्रदर्शन केलं.
त्या एका निर्णयामुळं तो अंतिम सामना भारताला जिंकून देण्यात धोनीने मोलाचा वाट उचलला. १९८३ नंतर तब्बल २८ वर्षांनी भारताने क्रिकेटचा विश्वकरंडक आपल्या नावावर केला होता. आज ७ जुलै धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप साऱ्या शुभेच्छा…