Publish Date: Sat, 08 Feb 2020 (16:26 IST)
Updated Date: Sat, 08 Feb 2020 (16:27 IST)
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात २७४ धावांचे आव्हान असताना २५१ धावांवर सामना संपुष्टात आल्याने भारताचा पराभव झाला आहे. आघाडी आणि मधल्या फळीतील खेळाडूंनी निराशा केल्यानंतर रविंद्र जडेजाच्या हातात सामना होता. मात्र संघर्ष करूनही त्याला विजय मिळवता आला नाही.
या सामन्यात भारताची सुरुवातच खराब झाल्याने एकंदरीतच सामन्यात मरगळ आली. एकापाठोपाठ एक भारतीय खेळाडू तंबूत परत येत असल्याने हा सामना न्युझीलंडच्या हाती जाणार हे सामना सुरू होताच जाणवले. सुरुवातीलाच दोन्ही सलामवीर बाद झाले, त्यानंतर विराट कोहली देखील अवघ्या १५ धावांवर बाद झाला. केएल राहुल देखील ४ धावांवर बाद झाल्याने भारतीयांची निराशा झाली. तसेच, केदार जाधवही ९ धावांवर माघारी परतला. केवळ १०० धावा होण्याच्या आतच भारताचा अर्धा संघ तंबूत परतल्याने श्रेयस अय्यरकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्याने अर्धशतकी खेळी करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या १० षटकांत रविंद्र जडेजाने शानदारखेळी करत संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. नवदीप सैनीसह त्याने आठव्या विकेटसाठी ७६ धावांची भागिदारी केली. सैनीने ४५ धावा मारल्या. त्यानंतरही जडेजाटचा संघर्, सुरूच होता. मात्र ४९ व्या षटकांत तो बाद झाला.