Publish Date: Fri, 12 Jan 2024 (11:01 IST)
Updated Date: Fri, 12 Jan 2024 (11:08 IST)
भारतात दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनाला समर्पित आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची सुरुवात 1985 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्यांच्या विचार आणि आदर्शांसाठी प्रसिद्ध होते. लहान वयातच त्यांनी आपल्या कल्पनांनी जगभरात स्वतःची वेगळी प्रतिमा आणि ओळख निर्माण केली होती. त्यांनी नेहमीच तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रेरित केले, म्हणूनच त्यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1984 साली संयुक्त राष्ट्र संघाने ते वर्ष आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर भारत सरकारने यावर विचार केला आणि 1984 पासून दरवर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंती 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 1985 मध्ये देशात प्रथमच राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.
महत्त्व आणि उद्देश्य -
कोणत्याही देशाचा उत्तम विकास त्या देशातील तरुणांवर अवलंबून असतो. भारत हा तरुण लोकसंख्या असलेला देश आहे आणि देशाची प्रगती तरुणांवर अवलंबून आहे. त्यामुळे देशातील तरुणांना योग्य मार्गदर्शनासाठी हा दिवस साजरा केला जातो. विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त युवा दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की, युवकांनी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावावा.
राष्ट्रीय युवा दिनाची थीम-
यंदा राष्ट्रीय युवा दिनाची थीम इट्स ऑल इन द माइंड अशी ठेवण्यात आली आहे. या थीमचा अर्थ सर्वकाही आपल्या मनात आहे.अर्थात तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती गोष्ट किंवा काम पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
देशात राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये थीमसह स्पर्धा आयोजित केल्या जातात. याशिवाय मुले स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार सांगतात .