शासनाने सुरू केलेला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणी आहे. पण तरीही याचा प्रचार समाजातील तळागाळापर्यंत अजूनही पोचलेला नाही किंवा पोचला असेल तर त्याचे प्रबोधन म्हणावे तेवढे यशस्वी झाले नाही, असे वाटते. कारण आजही वंशाला दिवा पाहिजे म्हणून कितीतरी स्त्रीभ्रूण हत्या झालेल्या घटना आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि टीव्हीवर पाहतोसुद्धा.
वैद्यकीय उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे जाण्याचा योग आला. तेव्हाचा हा प्रसंग. मी डॉक्टरांची वाट पाहात बसले असतानाच मुलींनी खचाखच भरलेली एक रिक्षा हॉस्पिटलच्या दारात येऊन थांबली. त्या रिक्षातून एक वर्षापासून 14-15 वर्षार्पतच्या आठ मुली खाली उतरल्या. समोरच सीटवर ड्रायव्हर शेजारी बसलेले त्यांचे वडील त्या रिक्षावाल्याला पैसे देत खाली उतरले. त्या मुली एकमेकींशी गप्पागोष्टी करत होत्या आणि ‘आपले पप्पा’ असं काही ना काही कारणावरून सांगत होत. तेव्हा लक्षात आलं की, या आठ कन्यारत्नांचे ‘भाग्यविधाते’ हेच असावेत. त्यांच्याकडे पाहून माझी त्यांच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा अधिकच वाढली आणि न राहवून मी त्या दवाखान्यातील एका परिचारिकेला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की, गेली बरीच वर्षे हा माणूस आपल्या पत्नीला घेऊन या डॉक्टरांकडे येतो. कारण त्यांना मुलगा हवा आहे. अनेक दवाखाने पालथे घातले. पण मुलगाच होत नाही. या रिक्षात बसलेल्या आठ आणि एक विवाहित मुलगी अशा नऊ मुली त्यांना आहेत.
हे ऐकून मी नि:शब्द झाले. कारण मीही एक स्त्रीच होते. त्यामुळे त्या स्त्रीची मानसिकता, शारीरिक अवस्था काय झाली असेल किंवा ती कशी दिसत असेल हे पाहाण्याची माझी इच्छा झाली. परंतु तो माणूस या खेपेला फक्त औषध नेण्यासाठीच आला होता असं समजलं आणि तेही 30-40 किलोमीटर अंतर पार करून.
रिक्षातून खाली उतरू पाहाणार्या त्या एक वर्षाच्या चिमुरडीला सावरणारी आणि इतर छोटय़ा बहिणींना मोनं विचारपूस करणारी, त्यांना आधार देणारी ती 14 वर्षाची मुलगी पाहून डोळे पाणावले आणि वाटलं की, आजही प्रत्येक घरी ज्ञानाचे दिवे लावले जात असतानाही या माणसाला वंशाचा दिवाच का हवा असेल? आजच्या काळातील स्त्री कोणच्याच क्षेत्रात मागे नाही. सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांची उदाहरणे फक्त वाचण्यापुरती किंवा ऐकण्यापुरतीच मर्यादित असावीत?
‘नीरजा’ (सोनम कपूर अभिनीत चित्रपट) याचे जिवंत उदाहरण आहे. एक मुलगी असूनही ती आपला जीव पणाला लावून विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवते. बिकट परिस्थिती असतानाही ती संकटाला न घाबरता निर्भीयपणे तोंड देते आणि हे फक्त एक मुलगीच करू शकते. हे सर्व चित्र डोळ्यासमोरून फिरत असताना आणि या विचारांच मालिकेमध्ये अडकलेली, स्वत:ला हरवून बसलेली मी डॉक्टरांच्या येण्याने भानावर आले.