Publish Date: Wed, 04 Aug 2021 (23:34 IST)
Updated Date: Wed, 04 Aug 2021 (23:36 IST)
नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा आणि पाऊस थांबल्यानंतर होणारा उकाडा या गोष्टी एकामागोमाग असतातच. त्यामुळं सर्दी – ताप आणि इतर आजारांना साहजिकच आपण निमंत्रण देतो. निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यात आपण नक्की काय करू शकतो, कोणत्या चुका टाळू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
१. छत्री वा रेनकोट घ्यायला विसरु नका – पावसाळ्यामध्ये वातावरण असो वा नसो कायम छत्री अथवा रेनकोट घेऊन जावे. कधीही या गोष्टी नेण्यास विसरू नका. पावसामुळे सर्दी ताप हे आजार होणं साहजिक आहे. त्यामुळं पावसात भिजून दिवसभर तसंच स्वतःला ओलं ठेऊ नका.
२. रस्यावरील आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा – पावसाळ्यात सर्वात जास्त आजार होतात. त्यामुळं रस्त्यावरील खाणं आणि तळलेलं बाहेरचे पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा. या खाण्यामुळं पोटात गॅस तयार होऊन पोटदुखी होण्याचा संभव असतो. तसंच खराब पाण्याचा वापरदेखील या पदार्थामध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळं आपण स्वतः याची खबरदारी घेणं योग्य.
३. पाणी पिण्याचं प्रमाण कमी करू नका – पावसाळ्यात तहान जास्त लागत नसल्यामुळं साहजिकच पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र असं करू नका. त्यामुळं डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. इतकंच नाही त्यामुळं प्रतिकारशक्ती कमी होऊन तुम्हीच आजारांना निमंत्रण देता. पावसाळ्यामध्येदेखील चार ते पाच लीटर पाणी प्या.
४. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका – जेवणापूर्वी वा जेवणानंतर स्वच्छ हात धुणं गरजेचं आहे. त्यामुळं हात न धुता कधीही जेऊ नका. बाहेरून आल्यानंतर पावसाळ्यातील चिखलामुळं बरेच बॅक्टेरिया अंगावर असतात. त्यामुळं स्वच्छ पाय धुवून मगच घरात यावं. केवळ पाण्यानं पाय न धुता साबणानं स्वच्छ पाय धुवावे.
५. कपडे धुण्याकडे दुर्लक्ष करू नका – पावसाळ्यामध्ये कपडे लवकर सुकत नाहीत आणि भिजल्यामुळे प्रत्येक वेळी तुमच्या लॉन्ड्री बास्केटमध्ये कपड्यांची भर पडत रहाते. वातावरणातील ओलसरपणामुळं कपड्यांमध्ये बॅक्टरिया सहज पोसले जातात. यामुळं लंग इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये कपडे साचून न ठेवता वेळीच धुवा.