Publish Date: Wed, 05 May 2021 (17:25 IST)
Updated Date: Wed, 05 May 2021 (17:30 IST)
सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. या माध्यमामुळे नात्यांची परिमाणं बदलू लागली आहेत. नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ लागला आहे. तुमच्याही नात्यात सोशल मीडियामुळे तणाव निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी काय करता येईल याविषयी...
* सोशल मीडियावर बर्याच पोस्ट्स, फोटोज अपलोड होत असतात. हे फोटोज बघून आपण अगदी नकळत आपल्या नातेसंबंधांची तुलना करू लागतो. यामुळे वाद, भांडणं होतात. मात्र प्रत्यक्षात सोशल मीडियावर सगळं काही गोड गोड दिसत असलं तरी प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या आधारे नात्यांची तुलना करू नका.
* सोशल मीडियावर आपल्या जोडीदाराला फॉलो करण्यात काहीच गैर नसलं तरी त्याच्या वैयक्तिक स्पेसशी छेडछाड करू नका. त्याच्या खात्याबाबत फार विचारही करू नका.
* सतत सोशल मीडियावर राहू नका. त्यातून थोडा ब्रेक घ्या. स्वतःला आणि कुटुंबीयांना वेळ द्या. थोडं वाचन करा. आवडता छंद जोपासा. डिजिटल डिटॉक्सही आवश्यक आहे हे नेहमी लक्षात ठेवा.
* बर्याच जणी आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र असं केल्याने नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या आयुष्यातले व्यक्तिगत क्षण तुमच्यापुरतेच ठेवा. त्याची जाहिरात करू नका.
* तुमचं सोशल मीडिया खातं सर्व जण बघतात हे लक्षात ठेवा. तुमच्या ऑफिसमधले सहकारी, वरिष्ठही फेसबुक किंवा अन्य साईट्स बघतात. त्यामुळे त्यावर भलत्याच पोस्ट्स टाकू नका.