Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्यामची आई - रात्र अकरावी

Marathi Book Shyamchi Aai Ratra Akravi Bhootdaya
भूतदया
"राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको.' श्याम म्हणाला.
 
आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूस करू लागला; परंतु भिका कसचा ऐकतो! 'इथे दिवा असला, म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हांला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळयांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते, तर नाटक अंधारातही करता आले असते.' भिका म्हणाला.
 
'मी काही नाटक नाही करीत; माझ्या हृदयातील बोल तुम्हांला सांगत आहे.' श्याम म्हणाला.
 
'आम्ही नाटक नाही म्हणत. परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत; परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावयास जात. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत.' नामदेव म्हणाला.
 
'बरे असू दे दिवा. तुम्हाला ज्यात आनंद, त्यातच मला,' असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरूवात केली:
 
एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहेळयाचे झाड होते. एकाएकी टप् असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला, ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडपडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळागोळा झाला होता. अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते. डोळेसुध्दा ते नीट उघडीत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो, त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एक सारखे हलत होते, खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाणे ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरविले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघे होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेविले. आम्हीही लहान होतो. आम्ही तरी काय करणार? बालबुध्दीला जे जे सुचेल, ते ते करू लागलो. त्या पिलाला दाणापाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्याला पिलाला खाता येत होते, की नाही, त्या आमच्या काळजीनेच, आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना याचा आम्ही विचारच केला नाही.
 
या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरूरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ; ज्ञानहीन प्रेम तेही फुकट; प्रेमज्ञानहीन शक्ति व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली; परंतु दुस-यावर प्रेम नसेल, तर त्या शक्तीचा दुरूपयोग व्हावयाचा. मजजवळ ज्ञान आहे; परंतु दुस-यावर प्रेम नसेल, तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुस-यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल, तर ते प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे; परंतु त्या मुलांची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी, याचे ज्ञान जर तिला नसेल, तर त्या आंधळया प्रेमाने जे खावयास देऊ नये, तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल! समजा, आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे; परंतु ती जर स्वत: अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा, प्रेम म्हणजे हृदयाचा विकास; ज्ञान म्हणजे बुध्दीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुध्दी या तिहींची वाढ जीवनात हवी.
 
आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो. परंतु आम्हांला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले! गरीब बिचारे! आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली ! मी त्याला म्हटले, 'आम्ही तुला पिंज-यात कोंडून नाही हो ठेवणार! तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो, तुझ्या आईसाठी तरी नको, रे मरू! ती केविलवाणी ओरडत असेल. घिरटया घालीत असेल.'
 
आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटले, 'आई! हे पिलू बघ ग कसे करते आहे! अगदी मान वर करीत नाही. त्याला काय खावयास देऊ?'
 
आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, 'श्याम! हे जगणार नाही, हो. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका. त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले; गरीब बिचारे!' असे म्हणून आईने ते पिलू खाली कापसावर ठेविले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वासून ते मरून पडले. गेले, त्याचे प्राण गेले! त्याचे आईबाप, भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हांला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरावयाचे, असे आम्ही ठरविले.
 
आईला जाऊन विचारले, 'आई! या पिलाला आम्ही कोठे पुरू? चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, 'त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोग-याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील, मोग-याची फुले अधिकच तजेलदार दिसतील. कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिलू विसरणार नाही. त्या फुलांत तुमच्यासाठी ते येईल व तुम्हांला गोड वास देईल.'
 
मी म्हटले, 'त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं, होय ना? सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले, त्यावर डाळिंबाचे झाड लाविले; परंतु सोनसाखळी बापाला भेटावयाला डाळिंबात आली. तसेच हे पिलू येईल, हो ना? मग शेवंतीची फुले किती छान दिसतील? फारच वास येईल, नाही का ग आई?'
 
आई म्हणाली, 'जा लौकर पुरा त्याला. मेलेले फार वेळ ठेवू नये.'
 
'त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना.' मी म्हटले. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले. जेथे फुलझाडे होती, तेथे गेलो. शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळयांतून पाणी गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेविला; परंतु त्यावर माती ढकलवेना! लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये, म्हणून वरती सुंदरसा दगड ठेविला व आम्ही घरी आलो. माजघरात बाजूला बसलो व रडत होतो.
 
'का, रे बाजूला बसलास?' आईने विचारले.
 
'आई! मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे!' मी म्हटले.
 
आई हसली व म्हणाली, 'अरे वेडया, सुतक नको हो धरावयाला.'
 
मी म्हटले, 'आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो, ते?'
 
आई म्हणाली, 'माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, यासाठी त्याच्या जवळ असणा-या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे; म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत. म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता! बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले!'
 
आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. 'आई ! तुला कोणी हे सांगितले?' मी विचारले.
 
आई म्हणाली, 'मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते व ते मला खरे वाटले. जा, हातपाय धुऊन ये, म्हणजे झाले. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिलेत, चांगले केलेत. देवही तुमच्यावर प्रेम करील. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली, तरी दुस-या मित्रास उभे करील. देवाच्या लेकरास, कीड-मुंगी, पशुपक्षी, यांना जे द्याल, ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम! तुम्ही पाखरावर प्रेम केलेत, तसे पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल; परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल. तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका; तिला भरपूर प्रेम द्या.'
 
आई हे सांगत असता गहिवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले, हे का तिच्या डोळयांसमोर होते? का ती नेहमी आजारी असे, तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधी नेले नाही, म्हणून तिला वाईट वाटत होते? तिच्या भावना काही असोत; परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात; परंतु माणसांच्या मुंडया मुरगळतात! मांजरे, पोपट यांवर प्रेम करतात; परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करीत नाहीत, हे आपण पाहत नाही का?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्यामची आई - रात्र दहावी