Publish Date: Thu, 07 May 2020 (17:35 IST)
Updated Date: Thu, 07 May 2020 (17:39 IST)
एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला,'' स्वामीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही? मातेइतकाच पितासुद्धा महत्वाचा असूनसुद्धा पित्याला फारसे का महत्व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'
स्वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्या व्यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला व त्या व्यक्तिच्या हाती देत ते म्हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाईल.''
दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला, ''स्वामीजी माझी कंबर, पोट दोन्हीही खूप दुखत आहे. एक प्रश्न काय विचारला मी, तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले त्याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.''
स्वामी मंद स्मित करत म्हणाले, ''बंधू, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्या मातेची महती ही तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठच आहे.''
तात्पर्य
आई सारखे दुसरे दैवत जगात नाही.