Publish Date: Tue, 05 May 2020 (11:01 IST)
Updated Date: Tue, 05 May 2020 (11:05 IST)
देशात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई आणि पुणे येथील परिस्थिती वाईट आहे. लॉकडाऊन सध्या तिसर्या टप्प्यात आहे ज्या दरम्यान निर्बंध शिथील केले जात असून जनजीवन पुन्हा सुरळीत करण्याचे प्रत्यन आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही जनजीवन नेहमीप्रमाणे नसेल असं सांगण्यात येत आहे अशात या सर्व परिस्थितींचा परिणाम सण-उत्सवांवर देखील पडणार.
महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत धूमधडाक्याने साजरा केला जातो परंतू करोनाचा प्रभाव यावरही बघायला मिळणार. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. म्हणून यंदा लोकांना कमी गर्दी करण्याचं आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
लॉकडाउनमुळे अनेक गणेश मूर्तीकारांनाही आपलं काम अद्याप पूर्ण करता आलेलं नाही. यामुळे आता गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करता येईल हा देखील मोठा प्रश्नच आहे.
दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीप्रमाणे देखील गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल मात्र नेहमीप्रमाणे साजरा न होता अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.