Publish Date: Tue, 14 Jan 2025 (18:23 IST)
Updated Date: Tue, 14 Jan 2025 (18:34 IST)
मुंबई आणी नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूच्या बांधकामाला एक वर्ष झाले आहे. या सेतूवरून वाहनांच्या कमी वाहतुकीची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीला अटल सेतूवरून दररोज अंदाजे 56 हजार पेक्षा जास्त वाहनांची वाहतूक होत होती. मात्र आता सेतूवरून दररोज 23 हजार पेक्षा कमी वाहनांची वाहतूकीची नोंद झाली आहे.
अटल सेतूचे उदघाटन 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. हा सेतू मुंबईतील शिवडी-न्हावा शेवा याला जोडणारा असून अंदाजे 22 किलोमीटर लांबीचा आहे. या पुलाच्या उदघाटनांनंतर मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल होणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र मुंबईची वाहतूक स्थिती जशी होती तशीच आहे. या सेतूवर जास्त टोल असल्याने वाहनचालक जुन्या मार्गाचा वापर करत आहे.
अटल बिहारी बाजपेयी शिवडी -न्हावा शेवा अटल सेतू अंदाजे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल असून समुद्रावरील अंदाजे 16.5 किलोमीटर लांबीचा आणि जमिनीवर 5.5 किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (या वर्षाच्या शेवटी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे) दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या पुलाच्या बांधकामामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात प्रवासाचा वेळ कमी झाला आहे