Publish Date: Mon, 05 Sep 2022 (07:43 IST)
Updated Date: Mon, 05 Sep 2022 (07:52 IST)
शनिवारी रात्रीपासून मुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरात पावसाने हजेली लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.
मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलसा मिळाला आहे. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी रात्री रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन परिसरात काही वेळ जोरदार पाऊस झाला. मुंबईसह राज्यातील इतरही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.